इमारत स्थलांतराचा प्रश्न निधी मंजूर असताना रेंगाळला
केशवनगर-मांजरी रस्त्यालगतच्या शाळेला संरक्षक भिंतच नाही
मांजरी – केशवनगर-मांजरी बुद्रुक रस्त्यावरील गोडबोले वस्तीवरील जिल्हा परिषद भाग शाळेची इमारत रस्त्याकडेला असून तिला सुरक्षा भिंत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. वर्ग रस्त्यालगत आहेत तसेच सुट्टीच्या वेळेत मुले रस्त्यालगत खेळत असतात, अशावेळी अपघाताचा धोका असल्याने शाळेला संरक्षक भिंती असणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा प्रशासनाकडून शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याने पालक तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंढवा-मांजरी रस्त्याच्या रुंदीकरणात जागा गेल्याने शाळेची इमारत थेट रस्त्यालगत आली आहे. तेव्हापासून सुरक्षा भिंतीची गरज असताना अद्यापही ती बांधण्यात आलेली नाही. शाळा इमारतीचे रंगकाम उडालेले आहे. फरशा तुटलेल्या आहेत. स्वच्छतागृहातील भांडे, दरवाजे नादुरुस्त आहेत. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा आवाज विद्यार्थ्यांच्या अध्ययनात बाधा आणीत आहे. संपूर्ण भयग्रस्त वातावरणात मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत.
यामध्ये एकूण 119 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ दोनच वर्गखोल्या असल्याने सकाळ व दुपार अशा दोन वेळांत शाळा भरते. मुख्याध्यापकासह चार शिक्षक येथे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान तर उपलब्ध नाहीच. मात्र, वर्गाबाहेर पडायलाही धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मधल्या सुट्ट्या व शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सतत मागे राहावे लागत आहे.
एका भाग शाळेचा अपवाद वगळता गावातील जिल्हा परिषद मुख्य शाळेसह येथील सर्व भाग शाळांमध्ये विद्यार्थी संख्या मोठी आहे. शहराला लागून असल्याने या गावात मोठ्या प्रमाणात मोलमजुरी करणारा व गरीब वर्ग स्थायिक झाला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थी संख्या मोठी आहे. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षणात बाधा येत आहे. या परिसरात खासगी शिक्षण संस्थामुळे मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. यातूनच गावातील जि. प. शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत असताना येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे. मात्र, इमारत स्थलांतराचा प्रश्न सुटलेला नसल्याने निधी वापरता येत नाही. याबाबत ग्रामपंचायत, शाळाव्यवस्थापन समिती, जागामालक व वरिष्ठांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– रामदास वालझाडे, गटशिक्षण अधिकारी