मुंबई – राज्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, 55 उड्डाणपूल अशी अनेक काम केले. दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न असून त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे.
मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, त्या काळात बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता.
आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असून संमती मिळाल्यास ही योजना प्रत्यक्षात येईल. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. तसेच मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
याशिवाय सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी 50 टक्क्यांनी कमी होईल. तसेच समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.