पिंपरी – भारतामध्ये बालस्थूलत्व एक मोठी समस्या बनत चालली आहे. सध्या देशात 1.44 कोटींपेक्षा जास्त मुले स्थूलत्वाच्या श्रेणीत असून भारत भारत जगातील सर्वाधिक स्थूल मुलांचा दुसरा मोठा देश ठरला आहे. पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. संजय कुमार मिश्रा यांच्या मते, या चिंताजनक वाढीच्या मुळाशी फास्ट फूडची वाढती सवय, पोषकतत्त्वांची कमतरता, घरातील बदललेली जीवनशैली, कमी होत चाललेली शारीरिक क्रिया आणि डिजिटल स्क्रीनचे व्यसन हे घटक आहेत. मुले भरपूर खात असली तरी त्यांच्या आहारात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता दिसून येते, तर पिझ्झा, बर्गर, फ्राईज, मोमो आणि गोड पेयांमध्ये साखर व चरबीचे प्रमाण खूप असल्यामुळे चरबी शरीरात वेगाने साचते. फास्ट फूडमध्ये वापरले जाणारे एमएसजी, प्रोसेस्ड चीज आणि फ्लेवर एन्हांसर्स मुलांची भूक वाढवतात आणि खाद्याची चटक निर्माण करतात. यामुळे पोट भरलेले असताना देखील मुले जास्त खातात. परिणामी, लहान वयातच हार्मोनल असंतुलन, टाइप 1 डायबिटीज, इन्सुलिन रेसिस्टन्स, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि थायरॉइड विकार उद्भवू लागतात. मुलांच्या मानसिक आरोग्यावरही याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यांना स्वतःच्या शरीराविषयी कमीपणा वाटणे, मित्रांकडून चिडवणूक, आत्मविश्वास घटणे, ताण आणि चिंता या समस्या वाढताना दिसतात. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, 5 वर्षांखालील मुलांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये 10 टक्के पेक्षा जास्त मुले ओव्हरवेट आहेत. 11 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये हा धोका आणखी वाढलेला आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे बाहेर खेळण्याचे प्रमाण कमी झाले असून मोबाइल, टॅब आणि व्हिडिओ गेमवर वेळ घालविला जात आहे. मुळे शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हे आहेत उपाय डॉ. मिश्रा यांच्या मते, बालस्थूलत्वावर नियंत्रण मिळवण्यासाठी कुटुंबाने एकत्रित प्रयत्न करावेत. घरात आरोग्यदायी भोजन, जंक फूड टाळणे, मुलांना दररोज किमान 60 मिनिटांसाठी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक क्रियेत सहभागी करणे, स्क्रीन टाइम निश्चित करणे आणि पुरेशी झोप यांची खात्री करणे गरजेचे आहे. पालकांनी स्वतः चांगल्या सवयी अंगीकारल्यास मुले त्या अधिक सहजपणे स्वीकारतात. विशेषतः किशोरावस्था (13–19 वर्षे) हा शरीरातील बदलांचा महत्त्वाचा कालावधी आहे. या वयात मुलांचा मेटाबॉलिझम आणि हार्मोनल क्रिया जलदगतीने बदलतात. त्यामुळे या काळात योग्य आहार आणि जीवनशैली अंगीकारली तर त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण आयुष्यभर टिकतो.