पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने बदलणाऱ्या युगात मनुष्यबळ विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी शहरातील अग्रगण्य विश्वकर्मा विद्यापीठ (VU) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) वतीने महत्त्वपूर्ण पूर्व-शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील मनुष्यबळ’ या विषयावर होणारी ही परिषद सोमवार, १५ डिसेंबर रोजी हयात इस्ता, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडिया एआय यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे. तसेच, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस यांनीही सहकार्य केले आहे. एआयमुळे शिक्षण व्यवस्था, आस्थापने आणि प्रशासकीय संरचनेत होत असलेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर, भविष्यासाठी सज्ज कौशल्ये आणि लवचिक शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या गरजेवर परिषदेत जोर दिला जाणार आहे. शिक्षण, उद्योग आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर- उच्च शिक्षण संस्था, धोरणकर्ते आणि उद्योगजगताने एकत्र येऊन मनुष्यबळ विकासात कशी गुंतवणूक करावी, यावर चर्चा करण्यासाठी ही एआय प्री-समिट एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या परिषदेत शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञान व्यावसायिक, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. चर्चेचे मुख्य विषय: -एआयच्या संदर्भात उदयोन्मुख कौशल्ये आणि अभ्यासक्रमातील परिवर्तन. -प्राध्यापकांची क्षमता वृद्धी आणि अजीवन शिक्षणाची चौकट. -कौशल्य दरी कमी करणे आणि रोजगारक्षमता वाढवणे. -नोकरी गमावण्याऐवजी एआय-सहाय्यक करिअरसाठी तरुणांना सज्ज करणे. या परिषदेमधून मुख्य भाषणे, तज्ज्ञांचे सत्र आणि विषयक चर्चांच्या माध्यमातून मानवी बुद्धिमत्ता आणि नैतिक निर्णयक्षमतेने मशीन इंटेलिजन्सला कसे पूरक ठरावे, याचा वेध घेण्यात येईल. जबाबदार एआय, कामगार पुनःकौशल्य (री-स्किलिंग), डिजिटल युगातील नेतृत्व आणि एआयचे सामाजिक परिणाम हे विषय चर्चेचे केंद्रबिंदू असतील. विश्वकर्मा विद्यापीठाचा हा उपक्रम राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि सर्वसमावेशक विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून, एआय युगात भारताच्या मनुष्यबळाच्या बळकटीसाठी धोरणात्मक सूचनांबरोबरच व्यावहारिक उपाययोजना सुचवण्याचा प्रयत्न या परिषदेद्वारे केला जाईल. देशभरातून मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असलेल्या या सहभागामुळे शिक्षण, नवकल्पना आणि वैचारिक नेतृत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख अधिक दृढ होणार आहे.