कॉर्पोरेट कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या अरोग्याच्या तक्रारी वाढल्या
विशीतील तरुणांपासून पन्नाशीपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत
– महादेव जाधव
कोंढवा – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. नागरिकांना 24 तास घरात बसून राहावे लागले. सध्या, अनलॉक होत असले तरी अनेक कॉर्पोरेट कंपन्या वर्क फ्रॉम होमवरच भर देत आहेत. अशा पद्धतीने काम करणाऱ्यांना अनेक आजारांचे निमंत्रण मिळत आहे.
लॅपटॉपच्या अतिवापराने डोकेदुखी, अंगदुखी, मानदुखी, पाठदुखी, डोळ्यांचे त्रास, हाडांचे दुखणे यासह पोटाचे विकार नागरिकांना अधिक प्रमाणात जडू लागले आहेत. यातून अपचन, बद्धकोष्टता आणि मूळव्याधाचे दुखणे वाढले आहे. यामुळे वर्क फ्रॅम होम म्हणजे घरात बसून आजाराला आमंत्रण.., अशी स्थिती झाली आहे.
लॉकडाऊन कालावधीनंतर अनलॉकमध्ये रुग्णालयांतील गर्दी ओसंडून वाहत आहे. अगदी विशीतील तरुणांपासून पन्नाशीपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सध्या, शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आर्थिक प्रश्नांतून चिडचिड, वादविवाद होत असल्याने मानसिक आरोग्य ढासळत आहे. यातून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने विविध जीवनसत्वे पुरवणाऱ्या गोळ्यांचे सेवन करीत आहेत. यामध्ये शरिरावर अति उर्जेचा मारा होत असल्याने यातूनही अन्य आजार होऊ लागले आहेत. कोणत्याही गोळ्यांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. पुरेशी झोप, योग्य आहार आणि योगाभ्यास, मोबाइल तासभर बंद करून मौन पाळावे, याचा निश्तितच फायदा होईल, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सध्या बाजारपेठेत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही गोळ्या, काढे आदींबाबत जाहिरीती केल्या जात आहेत. याची सत्यता न पडताळताच अनेक जण अशा अति उर्जेच्या (पॉवर) गोळ्या, काढ्याचे सेवन करतात. जीवनसत्वांसाठी गोळ्यांचे सेवन करताना ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावे.
– डॉ. चंद्रकांत हरपळे, फुरसुंगी
करोनामुळे बहुतांश जणांचे दैनंदिन चालणे-फिरणे बंद आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर याचा परिणाम झाला आहे. काही रुग्णांचे नियमित तपासणीचे वेळापत्रक कोलमडले असून औषध-गोळ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांच्या आहारावरही परिणाम झाल्याने साखरेचे प्रमाण वाढल्याचे तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
– डॉ. निखील सुरवसे, कोंढवा