ढाका – महिलांच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाला मलेशियाविरुद्ध डकवर्थ-लुइस नियमानूसार 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमावून 181 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर मलेशियाने पावसाचा व्यत्यय आला तोपर्यंत 5.2 षटकांत 2 गडी गमावून 16 धावा केल्या होत्या. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी डकवर्थ-लुइस सुत्रांनूसार निकाल देत भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले.
A comfortable win for India after rain stops play.#WomensAsiaCup2022 | Scorecard: https://t.co/FNM5HzPjwY pic.twitter.com/5MsQjXfRGT
— ICC (@ICC) October 3, 2022
भारताच्या डावात सलामीवीर शब्बीनेनी मेघनाने 53 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 1 षटकारासह 69 धावांची खेळी केली. या सामन्यासाठी स्टार फलंदाज स्मृती मानधनाला विश्रांती देण्यात आली होती. शफाली वर्माने 39 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. तर रिचा घोषने 19 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना 33 धावांची खेळी केली. मलेशियाकडून विनफ्रेड दुराईसिंघम व दुर दानिया सुहयादा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मलेशियाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड यांनी झडपट बळी घेत त्यांची स्थिती 2 बाद 6 अशी बिकट केली होती. त्यानंतर मात्र, मास एलिसा व एल्सा हंटर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरु झाला व सामना थांबवावा लागला. अखेर पंचांनी हा सामना पुढे होणार नसल्याचे सांगत भारतीय संघाला 30 धावांनी विजयी घोषित केले.
भारताचा पुढील सामना अमिरातीशी
या स्पर्धेत आता भारतीय महिला संघाचा मंगळवारी(दि.03) अमिरातीशी सामना होणार आहे. या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेल्या भारतीय संघाला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी येत्या शुक्रवारी लढत द्यायची आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अमिरातीशी होणारा सामना जिंकला तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ पूर्ण तयारीने उतरेल. हा सामना भारतीय संघाने जिंकला तर त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान बळकट होणार आहे.