Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS) : भारतीय महिला संघ आज (रविवार,दि.13) टी-20 विश्वचषक स्पर्धेत अनेकवेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना असेल ज्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला मोठा विजय नोंदवावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने मोहिमेची सुरुवात केली होती, परंतु पुढील दोन सामने जिंकून बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता बळकट केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारतासाठी सोपे जाणार नाही, पण ॲलिस हिलीच्या नेतृत्वाखालील संघ दुखापतींशी झुंजत आहे, ज्याचा फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांतून सहा गुण आहेत आणि त्यांचा रनरेट +2.786 आहे. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे तर उर्वरित स्थानांसाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान शर्यतीत आहेत. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानचा पराभव केला, परंतु क्षेत्ररक्षण करताना कर्णधार ॲलिसा हिलीच्या पायाला दुखापत झाली आणि वेगवान गोलंदाज टायला व्लेमिंकचा खांदा निखळला. रविवारच्या सामन्यात त्याचे खेळणं कठीण आहे. हिली खेळली नाही तर ऑस्ट्रेलियाला नवा कर्णधार, यष्टिरक्षक आणि सलामीवीर शोधावा लागेल. बेथ मुनी यष्टिरक्षण करू शकते, तर उपकर्णधार ताहलिया मॅकग्राकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. ‘अ’ गटाची गुणतालिकेत स्थिती…. भारताने श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला, हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे भारताच्या रनरेटमध्येही चांगली सुधारणा झाली आणि अंतिम चारमध्ये पोहोचण्याची शक्यताही बळकट झाली. या विजयासह भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. भारताचे चार गुण आहेत आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी एक विजय आवश्यक आहे कारण न्यूझीलंडला देखील अजून एक सामना खेळायचा आहे आणि ते सहा गुणांसह अंतिम चारमध्ये पोहोचू शकतात. अशा स्थितीत उपांत्य फेरीत पोहचण्याचं समीकरण नेट रन रेटवर जाईल. त्यामुळे भारताला मोठा विजय आवश्यक आहे. भारताचा निव्वळ रन रेट सध्या +0.567 आहे तर न्यूझीलंडचा रनरेट +0.282 आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत. जर त्यांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर सर्व संघांचे चार गुण होतील आणि पुढचे गणित नेट रन रेटवर येईल. त्यामुळे भारतीय संघाला फक्त जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहे. IND vs BAN 3rd T20 : भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 3-0 ने घातली खिशात… भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नेहमीच खडतर आव्हान दिले आहे आणि अस्तिवाच्या या लढाईत कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी आघाडीच्या फळीत धावा केल्या आहेत. या मैदानावर भारताचा हा पहिलाच सामना आहे आणि येथे धावा करणे सोपे नाही, त्यामुळे या तिघांव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्जवरही जबाबदारी असेल. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि ती पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.