वन खात्यामध्ये एखाद्या महिला अधिकाऱ्याने आपल्या कामाचा ठसा उमटवणे हे तसे दुर्मिळच मानले जाते. कर्तव्यावर असतानाही वृक्षलागवड, वन्य जीवांप्रती प्रेम व आपुलकी जपत, अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासह वन विभागातील अतिक्रमणे हटवणे तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी वन पर्यटनाच्या सुविधा निर्माण करणे ही कामे वाटतात तेवढी सोपी नक्कीच नाहीत; नसतातही. मात्र, जयश्री जगताप जाधव यांनी ही आव्हाने पेलताना वाटेत येणारे सर्व अडथळे लीलया दूर करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
वनविभागातील अडथळ्यांच्या शर्यती पार करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत वनपरिक्षेत्र अधिकारीपदी काम करणाऱ्या जयश्री जगताप जाधव यांनी अल्पावधीत लौकीक मिळविला आहे. प्रशासकीय कामकाजात सूसुत्रता, कर्मचाऱ्यांशी सूचना, मार्गदर्शन करीत त्यांनी गेल्या तीन वर्षांत वनविभागाचा कारभार लोकाभिमुख केला आहे. अनेक अवैध व्यवसायावर कारवाई करून त्यांनी शासनाच्या तिजोरीत महसूल जमा केला आहे. पुरंदरच्या सासूरवाशिण असलेल्या जगताप यांनी तालुक्यातील कामकाजात लोकसहभाग वाढविला आहे.
सासवड प्रादेशिक वन विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रणरागिणी जगताप-जाधव यांनी पारदर्शकता आणली आहे. वनविभागातील अनेक बेकायदेशीर प्रकारांना आळा घातला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कारवाई झाल्या आहेत.
जयश्री वामन जाधव यांचा जन्म 20 एप्रिल 1987 रोजी सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब येथे झाला. त्यांचे वडील मुंबई बीईएसटीमध्ये सेवा बजावत होते. जयश्री जाधव यांचे शिक्षण एम. एस. सी. ऍग्रीपर्यंत झाले. त्यांचा विवाह माहूर (ता. पुरंदर) येथील जितेंद्र वसंत जगताप यांच्याशी झाला. 2013 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी वर्ग 2 (राजपत्रित) पदावर त्यांची निवड झाली. फेब्रुवारी 2014 ते ऑगस्ट 2015 मध्ये वनप्रशिक्षण अकादमी (कुंडल, जि. सांगली) येथे त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले.
2015 मध्ये वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण जि. नांदेड येथे जयश्री जगताप यांची नेमणूक करण्यात आली. मे 2017 मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सासवड येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. ही जबाबदारी हे एक त्यांच्यासमोर आव्हान होते. त्यांच्या दृष्टीने पुरंदर तालुका नवीन नव्हता. तरी तालुक्यामध्ये कार्य बजावताना नुकसान होणार नाही, याची जबाबदारी त्यांच्यावर होती. जगताप यांनी अवैध लाकूड साठा करणाऱ्या आरागिरणीवर कारवाई करून मोठा दंड वसूल केला. तसेच 13 कोटी वृक्ष लागवडीतंर्गत वृक्षलागवड करण्यात आली. वाघ डोंगर, बोपगाव, भुलेश्वर, जेजुरी येथील वन पर्यटनाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. जलयुक्त व जलशक्ती अभियानअंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.
वृक्ष संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती, वन्य प्राण्यांमुळे पीक नुकसान व पशुधन नुकसानीबाबत लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. वनविभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमणे हटविली आहेत. आंबळे येथील रेल्वे दुहेरीकरणाचे काम करणाऱ्या खासगी कंपनीमार्फत केलेल्या अतिक्रमणामुळे संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल केली. कार्यालयामध्ये सात महिला कार्यरत आहेत. त्यांची त्यांना साथ मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा देवस्थान, सासवड येथील वाघडोंगर, श्रीक्षेत्र बोपगाव येथील कानिफनाथ देवस्थान, श्री क्षेत्र भुलेश्वर येथील महादेव मंदिर, वाल्मीक ऋषींच्या गावातील वाल्हे, या ठिकाणी पर्यटनाच्याबाबतीत योग्य प्रकारे व्यवस्थापन करून पर्यटकांना सुख सुविधा देण्यावर भर दिला. यामध्ये नवनवीन गार्डन तयार करून त्यामध्ये वन डायर, वॉच मनोरे, बसण्यासाठी बाकडी, लहान मुलांसाठी खेळणी, पिण्याचे पाणी, वन्य प्राण्यांचे स्टॅच्यू उभे, केले. यामध्ये बकरी, वाघ, सिंह, हरीण आदी पुतळे उभे केल्याने पर्यटनासाठी आकर्षण ठरत आहेत. मौजे हिवरे येथे निसर्गराजा स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने 1200 रोपांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केल्यामुळे ही झाडे हिरवीगार झाली आहेत.
वनपुरी येथे बाराशे रोपांना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या बांधून ठेवून रोपांना पाण्याची सोय केली. यामधूून मोठ्या वृक्ष संवर्धनाचा जागरच केला आहे. परिक्षेत्रामध्ये बिगर पास व अवैधरित्या लाकूड-फाटा आढळलेल्या तीन मिल सील करून दंडात्मक कारवाई केली, केतकावळे येथील 2008 मधील कोळसा प्रकरणातील तीन ट्रकवर कारवाई केली होती. वर्ष 2016 च्या कोर्ट निर्णयानुसार पुनश्च जप्त करून सरकार जमा करण्याची कारवाई केली आहे.
मौजे गुऱ्होळी येथे वनविभागाच्या जागेत अनेक वर्षापासून घरांचे अतिक्रमण झाले होते. ते स्थानिक नागरिकांना समजावून अतिक्रमणे काढण्यात आली. खोपी (ता. भोर) येथील अतिक्रमणे काढण्याच्या कारवाईत त्यांनी सहभाग घेतला होता. वन जमिनीचा ताळमेळ घालताना उपलब्ध दस्ताऐवजाची पाहणी करून परिंचे येथील 20 हेक्टर, गुरुळी येथील 39 हेक्टर व पिसे येथे 10 हेक्टर अतिरिक्त क्षेत्राचा शोध घेऊन ताबा घेण्यात आला. 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत सासवड वनक्षेत्रात नेमून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जादा रोपे रोपवाटिकेमध्ये तयार करून लागवड केली. जयश्री जगताप- जाधव यांच्या वनविभागातील उल्लेखनीय कामांबद्दल वनविभाग आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी लोकाभिमुख कार्याचा आदर्श प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे.
शिकारीच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई….
वर्ष 2008 मध्ये चिंकारा हरीण शिकार प्रकरणांमध्ये पाठपुरावा केल्याने, सासवड न्यायालयाने निकाल दिला. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. आंबळे येथील सशाच्या शिकार प्रकरणात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. रानमळा येथील लांडग्याच्या शिकार प्रकरणात आरोपींना ताब्यात घेतले. माहूर येथील सशाच्या शिकारप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. खळद येथील रानडुक्कर शिकार प्रकरणात 3 आरोपींना अटक केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. भिवडी येथे शिकार करण्याच्या उद्देशाने सापळा लावणाऱ्यावर कारवाई केली.
वन्य जीवांप्रती सहृदयतेने दर्शन
पुरंदर वनविभागाच्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी जयश्री जगताप या वन्यजीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे त्याचबरोबर अपघातांमध्ये दुखावल्यास त्यानां पुढील उपचार मिळेपर्यंत जगताप या प्रयत्न करीत असतात.
अपघातामध्ये जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना तात्काळ प्रथमोपचार करून कात्रज व पुणे येथील प्राणी संग्रहालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये 22 प्राण्यांचे जीवदान आत्तापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. वन विभागाचे सासवड, देवडी, नारायणपूर या तीन राऊंडमध्ये सासवड, नारायणपूर, देवडी, परिंचे, पांगारे, मांढर, जेजुरी, वाल्हे, आंबळे, या नऊ विभागात चालते वन्यजीव प्राणी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे प्रयत्न केले. यामध्ये वनपुरी, उदाचीवडी, हिवरे, पांगारे, सिंगापूर, या भागात नवीन तळी बनवली.
सिंगापूर, जेजुरी, परिंचे, पांगारे, बोपगाव, वाघापूर, पोंढे, आंबळे, राजवाडी येथील जुन्या पाण्याच्या टाक्याची दुरुस्ती करून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे काम केली. सासवड येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये सहा महिला व सहा पुरुष असा बारा लोकांचा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
शब्दांकन : अमोल बनकर, सासवड