मिटकरी; धर्माच्या नावाखाली मांडलेला व्यापार बंद होणे आवश्यक
सांगली – छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्तिमत्वे घडवायची असतील तर स्त्रियांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे. मात्र धर्म आणि कर्मकांडात आजच्या स्त्रिया अडकल्या आहेत. धर्माच्या नावाखाली मांडलेला व्यापार बंद होणे आवश्यक आहे. धर्माची नाही, तर विज्ञानाची कास धरली पाहिजे, असे प्रतिदान अमोल मिटकरी यांनी केले.
येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते. “मानव आणि धर्म चिंतन’ असा त्यांचा विषय होता. क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड अध्यक्षस्थानी होते. क्रांती समुहाचे प्रमुख अरूण लाड प्रमुख उपस्थित होते. मिटकरी म्हणाले, “क्रांतिकारकांच्या भूमीत क्रांतिकारी विचार असल्याशिवाय कोणीही बोलू शकत नाही.
आज धर्माशिवाय मनुष्य जगू शकत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसात केलेली धर्माची व्याख्या आचाणात आणणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर जातीजातीत तेढ निर्माण केले जात आहे. जोपर्यंत देशातील महिला सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत खर्या अर्थाने स्वतंत्र झालो. असे म्हणता येणार नाही. देव देवतांना, इतकेच काय तर निसर्गालाही मनुष्याने धर्माच्या जोखडात बांधले आहे. परंतु लोकांचा खरा धर्म मनुष्य धर्म आहे हे विसरता कामा नये.
“वृध्दाश्रमे देशाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. वृध्दाश्रमांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पध्दतीचा पुन्हा अंगीकार केला तर हे शक्य आहे. वाचन संस्कृती आत्मसात केल्याशिवाय अंधश्रध्दा निर्मूलन होणार नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले.