Pune District : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील जांबुत येथील घटना, परिसरात हळहळ

जांबुत : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा हौदोस सुरूच असून आठ दिवसापूर्वी पिंपरखेड (ता.शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज बुधवार (दि.२२) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जांबुत (ता. शिरूर) थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव या ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भागुबाई जाधव ही महिला सकाळी सहा वाजेच्या सुमारास लघुशंकेच्या निमित्ताने घराबाहेर आल्या असता घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरापासून पाचशे फुटावर असलेल्या उसाचे शेतात नेऊन ठार केले.
गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवन्या बोंबे मृत्यू प्रकरणानंतर या भागात शंभर पिंजरे लावण्यात येतील असे निर्देश जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी दिले होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी पंचतळे (ता. शिरूर) येथे सहा तास रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला होता.
जांबुत, पिंपरखेड आणि परिसरात बिबट्यांची संख्या ही 300 च्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वनविभागाने योग्य वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती अशा संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. जांबुत आणि परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची ही आठवी घटना असून या आधीच्या काळात वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.
मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीला मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला वनविभागाकडून थेट केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. शिवन्या बोंबे हिचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरखेड परिसरात केवळ दहा पिंजरे लावण्यात आले होते.सध्याचे स्थितीत फक्त सात पिंजरे कार्यान्वित असून बिबट्यांची संख्या पाहता या भागात अधिकचे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र ठोस उपाययोजना करण्यास वनविभागाची अकुशलता दिसून आल्याने हे बळी गेले आहेत अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.





