दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मनमानीमुळे महिलेचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
पुणे – पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोपांचा भडिमार झाला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तनिषा सुशांत भिसे या गर्भवती महिलेच्या कुटुंबाकडून रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी काही पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने तनिषाला दाखल करून घेण्यास नकार दिला. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. रुग्णालयाबाहेर आंदोलने सुरू झाली असून, प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. दीनानाथ मंगेशकर हे नावाजलेले रुग्णालय आहे. स्वतः लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबाने हे रुग्णालय उभे केले आहे. पण येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करण्यास नकार देत किंवा जादा पैसे मागून असंवेदनशीलता दाखवली. ही बाब अत्यंत गंभीर आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. धर्मादाय रुग्णालयांनी तरी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे मी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करेलच, शिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण कसे ठेवता येईल, यावरही लक्ष केंद्रित करेल. मेडिकल इथिक्सचे पालन होणे आवश्यक आहे. पैशांपेक्षा रुग्णांचा जीव महत्त्वाचा आहे. आमच्या मुख्यमंत्री कक्षानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, पण रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कठोर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, या घटनेने रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, सरकारच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तनिषाच्या मृत्यूमुळे आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





