पाटण -करोना महामारी संकटाच्या कालावधीत पाटण तालुक्यातील जनता, मिडीया व प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केल्यामुळेच मुंबई-पुणेसारख्या शहरातून मोठ्या प्रमाणावर लोक येऊनही पाटण तालुक्यात करोना नियंत्रणात राहिला. त्याचबरोबर गतवर्षीची पूरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी कोयना धरणातून पाणी सोडताना योग्य निर्णय घेतले जातील, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
करोना व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाटण तालुक्यात पहाणी दौरा केला. त्यानंतर तहसील कार्यालयात तालुक्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सी. के. यादव, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी उपस्थित होते.
तहसील कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, करोना महामारीच्या कालावधीत तालुक्यातील जनता, मिडीया व प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केले आहे. मुंबई, पुणेसह इतर परजिल्ह्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर लोक दाखल झाले असतानाही पाटण तालुक्यात करोनाचे संकट नियंत्रणात राहिले आहे. कोयना धरणात 30 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा असून यावर्षी हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार करता यावर्षीचे आपत्कालीन नियोजन काय असेल? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, गतवर्षीच्या पूरपरिस्थितीचा मी तीनवेळा आढावा घेतला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पूरेषेतील प्रत्येक कुटूंबाचे स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहे. अचानक अडचणी निर्माण होणार नाहीत यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.
पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ असून खातेदारांची संख्या जास्त आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची प्रत्येक विभागात रिक्त पदे जास्त आहेत. जिल्ह्यातून खात्याअंतर्गत कारवाई केलेल्यांना पाटणला पाठविले जाते. त्याचा जनतेला त्रास होतो याबाबत विचारले असता रिक्त पदांबाबत मी माहिती घेतो व नवीन नोकर भरतीत पाटणवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.