पाथर्डी -करोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने शेती कामाला सवलत दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सचा वापर करून प्रलंबित शेतीकामे सुरू केली आहेत. गहू, हरभरा, कांदा या पिकाची काढणी वेगाने सुरू झाली असुन काही ठिकाणी तर खळी दळी उरकून शेतीची पारंपरिक पद्धतीने नांगरणी सुरू झाली आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर ग्रामीण भागातही त्याचा चांगलाच प्रभाव दिसून आला.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर शेती कामे ठप्प झाली.त्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतात उभे असलेले पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याची पर्वा न करता साथरोगाला रोखण्यासाठी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. गावात व परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्याची वेळोवेळी माहिती प्रशासनाला दिली. परिसरात कोण येतो, कोण बाहेर जातो यावर बारीक लक्ष ठेवले. काही गावांनी तर गावात येण्यास व बाहेर जाण्यास बंदी घातली होती. लॉकडाऊनमुळे शेतीकामासाठी मजूर शेतात येत नसल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. शेती कामांना सवलत दिल्यामुळे रखडलेली कामे करता येणार आहे.