बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या पाच वैमानिकांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान
प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ति चक्र
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईकमध्ये सहभागी झालेल्या वायूसेनेच्या पाच शूर वैमानिकांचा सन्मान केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी वायूसेनेचे सन्मानचिन्ह देऊन या वैमानिकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना देखील वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. या वैमानिकांनी 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्प्सवर बॉम्ब हल्ला करत ते उद्ध्वस्त केले होते.
वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना देखील वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात येणार आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
तसेच यंदा भारतीय सैन्य दलाकडून 107 जवानांना वीरता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यात जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत वीर मरण आलेल्या शहीद प्रकाश जाधव यांचा मरणोत्तर कीर्ति चक्र पंर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कीर्ति चक्र हा दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. तसेच 8 जवानांना शांती चक्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय 8 जवानांना सेना पुरस्कार, तर 90 जवानांना वीरता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई संघर्षादरम्यान त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
विंग कमांडर अमित रंजन, स्क्वाड्रन लीडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बीकेएन रेड्डी आणि शशांक सिंह यांचा वायूसेनेकडून विशेष गौरव केला जाणार आहे. हे सर्व वैमानिकांनी मिराज-2000 हे लढाऊ विमान घेऊन बालाकोटमध्ये यशस्वी चढाई केली होती.
दरम्यान, अभिनंदन यांनी 27 फेब्रुवारी रोजी मिग-21 बायसन या विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग करुन, एक विमान पाडले होते. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केले. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना कैद केले होते. परंतु भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडावे लागले.