मुंबई – कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य चालविण्यासाठी महसुलची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मुद्यावरून सामना अग्रलेखातून याबाबत राज ठाकरेंच्या खरपूस समाचार घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. अशा शब्दात सामनातून टीका केली आहे.
आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राज ठाकरेंच्या या मुद्यावर निशाणा साधत ‘वाईन, डाईन आणि फाईन. व्वा! राज बाबू!!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे फक्त मद्यविक्रीच नाही तर मद्यनिर्मिती करणारे कारखानेदेखील बंद आहेत. याची आठवण सामना अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर.
‘मुसलमान और हिंदू है दो, एक, मगर
उनका प्याला,
एक, मगर उनका मदिरालय, एक मगर
उनकी हाला।
दोनों रहते एक न जब तक मस्जिद
मंदिर में जाते,
बैर बढ़ाते मस्जिद, मंदिर मेल कराती
मधुशाला।।’
हरिवंशराय बच्चन यांनी मधुशालेचे म्हणजे मदिरेचे सांगितलेले हे कौतुक सध्याच्या काळात रिकाम्या प्याल्यात डचमळताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. ‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए…’ असे नेहमीच म्हटले जाते, पण सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱया जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. गेले 35 दिवस महाराष्ट्रातील उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे बंद आहेत. ही पोळीभाजी केंद्रे, उपाहारगृहेसुद्धा सुरू व्हावीत. तसेच राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.