पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गासोबत आचार्य आनंद ऋषिजी चौक (पुणे विद्यापीठ चौक) ते रिझर्व्ह बॅंक (हरेकृष्ण पथाजवळ) उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी या दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेचार मीटर रुंद केला जाणार असून त्यासाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनास दिली आहे. त्या मुदतीत भूसंपादन होणार असले तरी प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू होण्यास दिरंगाई होण्याची चिन्हे आहेत.
रस्ता ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी तातडीनं कामे करण्यासाठी महापालिकेने सुमारे 8 कोटी 99 लाख रुपयांची निविदा काढली असली तरी, या निविदेचे काम पदरात पाडून घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने फिल्डींग लावली आहे. आपल्याच ठेकेदाराला हे काम मिळावे, यासाठी या आमदारांकडून थेट ठेकेदारांनाच फोन करून निविदा भरू नका, असा धमकीवजा सल्ला दिला जात असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे निविदांवरून वाद झाल्यास हे काम रखडण्याची चिन्हे आहेत.
उड्डाणपुलाच्या रॅम्पचे काम सुरू करायचे असल्याने पुणे महापालिकेने विद्यापीठ चौक ते रिझर्व्ह बॅंक या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने पुढील महिन्यात रॅम्पचे काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणी थेट पवार यांनी स्वत: लक्ष घालत 15 सप्टेंबरपर्यंत भूसंपादन करून रस्ता मोठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
खर्च गेला 25 कोटींवर
दरम्यान, महापालिकेने रस्ता रूंद झाल्यानंतर तातडीनं दुरुस्ती करायची असल्याने प्रशासनाने 9 कोटींची निविदा काढली असली तरी, या पुलाबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये चर्चा झाली. यावेळी या कामाचा खर्च 9 कोटींवरून 25 कोटींवर गेला असून आता 50 टक्के खर्च पीएमआरडीए तर 50 टक्के खर्च महापालिकेने करायचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आधी निविदा काढल्यानंतर खर्च वाढला कसा, प्रश्न उपस्थित केला जात आहे.
===================