मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषेचा ताळमेळ सोडून बोलणाऱ्या आणि मतदारांना प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. यामुळे नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल देण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, जयकुमार गोरे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, चित्रा वाघ यांना प्रलोभने देणारी वक्तव्य भोवणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याच वक्तव्य, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मी दर्शन होणार असल्याचे वक्तव्य, एकनाथ शिंदे यांच्याकडून तिजोरीच्या चाव्यांचे वक्तव्य, चित्रा वाघ यांच्याकडून खा कुणाचे पण मटण मात्र दाबा कमळाचे बटण अशी वक्तव्ये करण्यात आली होती. याच वक्तव्यांची दखल आयोगाने घेतली आहे.