१. काँग्रेस-वंचितचं जागावाटप आज जाहीर होणार ? आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीकडून रविवारी जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसयांच्यात चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या दोन्ही पक्षांशी पडद्यामागून चर्चा सुरु आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार कमी जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत शरद पवार गटाला स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते., वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 62जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तर काँग्रेस मुंबईत तब्बल 156 जागा लढण्याच्या तयारीत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. २ . अजित पवारांचा बारामीत दौरा, पहाटे बसस्थानकावर दाखल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली. बस स्थानकावर प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा योग्यरीत्या मिळत आहेत की नाही, याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी तिथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना संबंधित व्यावसायिकाने कडाक्याच्या थंडीत चहा घेण्याचा आग्रह केला. या आग्रहाला मान देत अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतला. ३ . महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतच ZP निवडणुकांची घोषणा? राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यानच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत घेतल्या जातील, अशी माहिती आहे. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊन ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ४. लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट खात्यात ३ हजार रूपये येणार की ४५०० रूपये येणार, याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे. कारण, नाव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्याचा लाभ अद्याप खात्यात अद्याप आला नाही. त्यात जानेवारी सुरू होण्यास फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० येतील, असेही बोलले जातेय. ही सगळी उत्सुकता लाडक्या बहिणींमध्ये असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत महत्त्वाचे आवाहन केलेय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खास आवाहन केलेय. आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय. आतापर्यंत राज्यातील ४० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्या सर्व लाडक्या बहिणींचा मासिक लाभ बंद होणार आहे. आदिती तटकरेंनी राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय ५.राज्यात थंडीचा कडाका वाढला उत्तर भारतात शीत लहर सुरु असल्याने महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा अधिक वाढत आहे. पुढील दोन दिवस वाऱ्यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो.आज राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहणार आहे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे.नाशिक, पुण्यात काल ९ अंशांची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी १० ते १२ अंशांच्या दरम्यान तापमान होते. उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात पहाटे आणि संध्याकाळी मोठी घट होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. ६. मालगाडीचा भयंकर अपघात ; ३ डब्बे नदीत कोसळले मध्यरात्री बिहारमध्ये मालगाडीचा भीषण अपघात झालाय. जमुईमध्ये रात्री १२ वाजता मालगाडी ट्रेनचे १७ डब्बे घसरले. यामधील ३ डब्बे नदीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. १२ डब्बे एकमेकांवर आदळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बधुआ नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. मालगाडी जसीडीहवरून झाझाकडे निघाली होती. या अपघातानंतर या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या अपघातात मालगाडीचे तीन डबे बथुआ नदीत पडलेत. जसीडीह येथून वरच्या ट्रॅकवर येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या मालगाडीला अपघात झाला. मध्यरात्री झालेल्या या रेल्वे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ७. अरावली पर्वतरांगांच्या वादात आता सर्वोच्च न्यायालयाने एन्ट्री अरावली पर्वतरांगांच्या वादात आता सर्वोच्च न्यायालयाने एन्ट्री घेतलीय. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलय. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांचे खंडपीठ सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वतरांगांमध्ये नवीन खाण भाडेपट्टे देण्यावर बंदी घातली आहे. खाण व्यवस्थापन योजना विकसित होईपर्यंत ही बंदी कायम राहील. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जगातील सर्वात जुन्या, ७०० किलोमीटर लांबीच्या अरावली पर्वतरांगांची पुनर्व्याख्या केली. त्यात म्हटले आहे की केवळ १०० मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरावली पर्वतरांग मानल्या जातील. उर्वरित टेकड्या वगळल्या जातील. जरी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की नवीन व्याख्येमुळे या पर्वतरांगांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, तरीही नवीन व्याख्येला विरोध केला जात आहे. ८. ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी पुतीन यांचा युक्रेनला गंभीर इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला गंभीर इशारा दिलाय. रशियाला वाटते की युक्रेनला शांततेच्या मार्गाने संघर्ष संपवण्यात फारसा रस नाही, तसेच जर चर्चा अयशस्वी झाली तर रशिया त्यांचे ‘विशेष सैन्य कारवाई’चे ध्येय पूर्ण करण्यासाठी बळाचा वापर करेल, असे पुतिन म्हणाले आहेत. युक्रेनविरुद्ध रशियन लष्करी कारवाई तीव्र करण्यात आलेली असताना पुतिन यांचे हे विधान आले आहे. ज्यात २७ डिसेंबर २०२५ रोजी कीववर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार्या महत्त्वाच्या भेटीपूर्वी हे हल्ले करण्यात आले होते. ९ . U-19 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ साठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळण्यात येणाऱ्या मालिकेसाठी अंडर-१९ टीमची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी कर्णधारपद वैभव सूर्यवंशीकडे देण्यात आला आहे. U-19 वर्ल्डकपसाठी संघाचं नेतृत्व आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आला आहे. परंतु आयुष दुखापग्रस्त असल्याने मालिकेसाठी खेळताना दिसणार आहे. ज्युनियर क्रिकेट सिलेक्शन कमिटीने आयसीसी मेन्स अंडर -१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२६ आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ३ सामन्यांची वनडे सीरीजसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. झिम्बाब्वे आणि नामीबियामध्ये १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विश्वचषकाची स्पर्धा होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात टीम इंडिया तीन सामने होणार आहेत. ३,५ आणि ७ जानेवारी रोजी सामने होणार आहेत. १०. अक्षय खन्नाची ‘दृश्यम 3’ मधून एक्झिट ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्ना सध्या ‘दृश्यम 3’ मुळे चांगला चर्चेत आहे. अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’ मधून एक्झिट घेतल्यामुळे चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्याच्या अव्यावसायिक वर्तनाबद्दल निर्मात्यांनी तक्रार दाखल केली आहे. अक्षय खन्नाचे ‘दृश्यम 3’सोडण्या मागचे खरे कारण समोर आले आहे. तसेच निर्मात्यांनी अक्षय खन्ना बद्दल स्पष्ट मत दिले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ‘दृश्यम 3’चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी, “अक्षय खन्नाने असे अचानक चित्रपटामधून एक्झिट घेतल्यामुळे माझे नुकसान झाले आहे. मी त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करून त्याला लीगल नोटीस पाठवली आहे. मात्र त्याने अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही…अक्षय खन्नाच्या डोक्याचत हवा गेली आहे. तो सेटवर टॉक्सिक वागायचा. त्याला मी ‘सेक्शन ३७५’ ची संधी दिली जेव्हा तो कोणतेही काम करत नव्हता. त्यानंतर त्याला ‘धुरंधर’ आणि ‘छावा’ चित्रपट मिळाले. त्यापूर्वी तीन-चार वर्षं तो घरी बसून होता…” असं म्हटलंय.