Manoj Jarange : …तर वर्षावर आंदोलनाला बसणार : मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Manoj Jarange : त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उद्यापासून अंतरवाली सराटी येथे जरांगे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजासाठी ही शेवटची लढाई असल्याचे सांगत जरांगे यांनी समाजातील कुणीही घरात बसू नये, असे आवाहन केले आहे. तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर थेट वर्षा बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा मोठा इशारा दिला आहे.
त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगेंचे आवाहन
मराठा समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले “समाजाने घरात बसू नये ज्यांनी अर्ज केले त्यांनी अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे. समाजाने मरगळ झटकून टाकावी व एकत्र यावे. ज्यांची नोंद सापडली पण प्रमाणपत्र दिले नाही अशा लोकांनी देखील अर्ज द्यावेत. मराठ्यांनी नोंद घेऊन घरी झोपू नये, अंतरवालीत यावे. ज्या मराठ्यांच्या निवडी झाल्या पण नियुक्त्या दिल्या नाही त्यांनीही अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे.”
…तर वर्षावर आंदोलनाला बसणार : जरांगेंचा आक्रमक पवित्रा
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले “मराठ्यांचे वाटोळे करू नका. फडणवीस, शिंदे मराठ्यांच्या पोरांचे तळतळाट घेत आहेत. ज्या बहिणींकडून राखी बांधून घेणार आहेत त्यांच्या लेकांचं काय झालंय बघा ना. तुमच्या श्रेयात लाडकी बहिणी मरायला लागल्या आहेत. तसंच, मला सरकारकडून फोन आले पण मी म्हणालो अंमलबजावणी द्या, मी आता आझाद मैदानात वा इतर कुठेही बसत नाही आता वर्षावर बसणार.”
५० लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत : जरांगेंचा आरोप
मुंबईतील आंदोलनाबाबतही मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संभ्रम ठेवत नाही. २९ ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार. यांनी दिलं नाही तर मुंबईत होणार. पाच टप्प्यात सहा कोटी मराठा मुंबईत जाणार.” अशी मोठी घोषणा त्यांनी केली. “नोंदी ५८ लाख आम्ही शोधल्यात. हे मीडियासमोर आम्ही वदवून घेतले होते. यांना ५० लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत.” असा आरोपही त्यांनी केला आहे. या आंदोलनाची घोषणा करण्याअगोदर मनोज जरांगे यांनी हे आंदोलन निर्णायक असल्याचे जाहीर केले होते.
मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या?
- ५८ लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलीडिटी द्या. हे प्रमाणपत्र कसे देणार हे अधिकाऱ्यांनी मला अंतरवालीत येऊन सांगावे.
- सातारा, कोल्हापूर, औंध पुणे गॅझेटचा जीआर हवा.
- बलिदान गेलेल्या कुटुंना पात्रतेनुसार नोकऱ्या द्या.
- स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा.
- सारथीच्या बंद केलेल्या योजना सुरू करा.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याजाचे परतावे द्या.
- मराठवाड्यातील ४ रद्द करण्यात आलेले जात प्रमाणपत्र वैध करुन द्या.
Nepal Flood: नेपाळवर पुन्हा महापुराचं संकट! तिबेटमधील झील ओव्हरफ्लो, पुढील ७२ तासांसाठी हाय अलर्ट






