पुणे -सध्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम एका व्यवस्थेकडून होत आहे. त्या माध्यमातून आपली मने कलुषित केली जात आहेत. ही व्यवस्था उलथून लावायची आहे. तेच सन्मान परिषदेतून केले जाणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पुण्यात केला.
विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सन्मान परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून जितेंद्र आव्हाड बोलत होते. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या परिषदेत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत, शिवव्याख्यात्या ऍड. वैशाली डोळस व्यासपीठावर उपस्थित होत्या. सन्मान परिषदेतून राज्यभरात 200 सभा होणार आहेत. त्याची सुरुवात आज झाली.
अंधारे म्हणाल्या, सर्वसामान्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्नांवर चर्चा न होता नवीन विषय ठरवून पुढे आणले जात आहे. त्यामुळे मूळ मुद्दाच बाजूला ठेवण्याचे षड्यत्र रचले जात आहे. सध्याच्या सरकारकडून डॅमेज, होप आणि ऍक्शन या त्रिसूत्रीचा वापर करून सत्तेचे राजकरण सुरू आहे. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांची भूमिका मांडण्यासाठी ही समता परिषद आहे. यावेळी संभाजी भगत यांनी शाहिरीतून सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच दीपक पोकळे, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय मोरे आदी उपस्थित होते..
जन की बात ऐका
हर घर तिरंगा उपक्रम राबविला जात आहे. मात्र हर घर तिरंगाबरोबरच हर घरात संविधान ही चळवळ सुरू करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बातमधून फारच बोलतात. ते आता जन की बातही ऐकायला हवी, असे मत ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.