राजगुरूनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसने घरे दारे उद्ध्वस्त केली पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त केल्या तुम्ही आणि आता सहानुभूती मागता का, हे सरकार जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार सांगतात. आम्हीही तेच म्हणत आहोत. तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशी टीका शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गोरगरीब जनतेला शिवारोग्य योजनेंतर्गत आरोग्याच्या चाचण्या एक रुपयांत करणार जेवण दहा रुपये आणि 30 टक्के वीज कपात करून देण्याची ग्वाही देतो. उद्याची कामे आमदार करणारच आहेत त्या करण्यासाठी मला हक्काचा आमदार पाहिजे आहे. मला हक्काचा आमदार तुम्ही द्या, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काळी कृत्य केली त्याचे परिणाम आहेत. धरणे कोरडी पडली, त्यावेळी तुमच्या भावना कोठे गेल्या? पाऊस पडला नाही तेव्हा काय बोलले? तुम्ही लोकांना फसवायला निघाले आहेत. म्हणे सुडाने वागवले जात आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे कोणाला सुडाने वागवले जात नाही आणि कोणालाही सुडाने वागू दिले जाणार नाही हे लक्षात ठेवा. सरकार कोणाचे असू द्या कोणावर सूड उगवला जात असले तर महाराष्ट्र त्याच्या पाठीमागे ढाल बनून उभा राहील, ही महाराष्ट्राची परंपरा आहे.
खासदार डॉ. कोल्हेंनी झेपते तेवढेच बोलावे
बैलगाडा सुरू होणार असे वचन देणाऱ्यांचे काय झाले. लोकसभा झाल्यानंतर बैलगाडा शर्यत सुरू होणार होती मात्र, त्याचे काय झाले. आता त्यांना जाब विचारा. झेपते तेवढेच बोलावे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.