पाटणा – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएने मोठी आघाडी घेतली आहे. यातही भाजपचे वर्चस्व दिसत असून जेडीएयूला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भाजपवर अवलंबून आहे.
बिहारमध्ये एनडीएने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये ७४ जागा भाजपला मिळाल्या असून जेडीयूला ४८ जागा मिळाल्या आहेत. नितीश सलग १५ वर्षे त्या राज्याच्या सत्तेवर आहेत. मात्र, इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच जेडीयूला एवढ्या कमी जागा मिळाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्री पद राहणार कि जाणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
भाजपा नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
तसेच जो कल आहे तसेच निकाल लागले तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. आम्ही आमचा शब्द पाळू, असेदेखील विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले आहे.