पुणे – हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्याला दुखापत झाल्याने निवड समितीने त्याला संघाबाहेर ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने गौतम गंभीरला कोणतेही सबळ कारण न देता संघाबाहेर ठेवले गेले तिच अवस्था रोहितची होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत थेट विधान करण्यासाठी कोणीही तयार नाही असेच संकेत मिळत आहेत.
भारतीय संघात कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा असे दोन गट पडल्याचे काही काळापूर्वी सांगितले जात होते. त्यात तथ्य नसल्याचेही मत दोन्ही खेळाडंनी अनेकदा स्पष्ट केले होते. मात्र, त्याचवेळी इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान कोहलीची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला रोहितने सोशल मीडिया अकाऊंटवरून अनफ्रेंड केल्याने त्यावेळी मोठी चर्चा रंगली होती. काही दिवसांनी या गोष्टीला पूर्णविरामही मिळाला होता.
आता पुन्हा एकदा संघातील गटबाजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संघातील बेबनावच रोहितला भोवल्याचे सांगितले जात आहे. संघातील खेळाडूंमध्ये संभ्रमाचे तसेच गटबाजीचे वातावरण तयार करण्यात गंभीरचा हस्तक्षेप असल्याचे सांगितले जात होते तोच प्रकार तर रोहितच्या बाबतीत घडत नाही ना, अशीही आता शंका येत आहे.
रोहितला दुखापत झाली असून त्याला विश्रांतीची गरज असल्याचा अहवाल भारतीय संघाचे फिजिओ देतात, त्यानंतर निवड समिती रोहितचा संघात समावेशही करत नाही. त्यानंतर दुखापत झालेली असतानाही मयंक आग्रवालचा समावेश केला जातो व या घटनेला दोन दिवसही होत नाहीत तोच रोहित सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तंदुरुस्त होऊन सहभागी होतो. यामागे काहीतरी घडत असल्याचीही नांदी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे जे गंभीरबाबत घडले तेच रोहितबाबतही घडत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही नंतर गंभीरला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर 2012 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी रोहितला संघात स्थान नाकारणे हा केवळ योगायोग आहे का रोहितला दिलेला इशारा ते लवकरच स्पष्ट होईल. मात्र, या मागे संघात दुहीचे राजकारणही सुरू असल्याचीही चर्चा आहे.