मुंबई -भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, येत्या काही काळात तो पूर्ण तंदुरुस्त ठरेल व भारतीय संघात आगामी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भारतातच होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करेल, असा विश्वास बीसीसीआय व एनसीए यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरीही बुमराह या स्पर्धेत खेळण्यासाठी कठोर मेहनत घेत असून लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठीही प्रयत्न करत आहे.
गेल्या वर्षी बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर श्स्त्रक्रियाही करण्यात आली. ही दुखापत त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर असताना झाली होती. त्यानंतर तो विविध मोठ्या स्पर्धांसह यंदा सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही खेळू शकला नाही. मात्र, एनसीएमध्ये तो दुखापतीवर मात करत असून तो लवकरच संघात पुनरागमन करेल, असे सांगितले जात आहे.
केवळ एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धाच नव्हे तर त्यानंतर होत असलेल्या विविध मालिका व आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा यांच्यात बुमराह निश्चितच खेळेल असेही सांगितले जात आहे. एनसीएनने त्याला गेल्या काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरुस्ती प्रमाणपत्रही दिले होते, त्याचा संघात समावेशही करण्यात आला होता. मात्र, तो मॅचफिट नसल्याचे समोर आल्यावर त्याला खेळवण्याचा धोका भारतीय संघाने पत्करला नाही व त्याला पुन्हा एनसीएमध्ये पाठवले गेले होते.