भाष्य : (प्रदीप लोखंडे) – राज्यात सत्ता बदल झाला की त्याचा परिणाम प्रत्येक शहरात, गावातील निवडणुकीत दिसून येतो. सत्ताधाऱ्यांकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढू लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडेही नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ वाढतोय. शहरातील आजी माजी खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरली. त्यांच्या पाठीमागे अनेक नेते, पदाधिकारीही जाऊ लागले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुका दोन्ही शिवसेनेसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचे शहरातील दौरे वाढत अहोत. परंतु या दौऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या शहरातील निष्ठावान कार्यकर्त्यापुढे आव्हान उभे करून चमकदारी कामगिरी केली, तरच मंत्र्यांच्या दौऱ्यांचे फलित झाले म्हणावे लागेल.
पिंपरी-चिंचवड शहराने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीतही पिंपरी विधानसभेत एक आमदार तर 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर पद मिळवू अशा घोषणा करणाऱ्या शिवसेनेला शिंदेंच्या बंडांनंतर पक्ष सावरता सावरताच नाकी नऊ येत आहे. पक्षात सध्या दुफळी पडली आहे. त्यामुळे शहरात कोणत्या शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडूण येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचे शहरात दौरे वाढले आहेत. या महिनाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दौरा पार पडला आहे. मंत्री सामंत महिनाभरात दोन वेळा शहरात उपस्थित राहिले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. मंत्री सामंत यांनी शहरातील उद्योजकांच्या समस्यांसाठी विधानभवनात बैठकही घेतली. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना अधिवेशनासाठी पॅकेज जाहीर केले.
एका बाजुला मंत्र्यांचे दौरे वाढले असले तरी खरे आव्हान पक्षवाढीचे आहे. मंत्र्यांचे दौरे पदाधिकाऱ्यांमध्ये उर्जा निर्माण करणारे ठरणे गरजेचे आहे. ते झाले नाही तर पुन्हा शहरात एककेंद्रीच नेतृत्त्वाकडे सत्तेची चावी राहिल. त्याचा फटका पक्षाला बसेल.
तीनही विधानसभेत हवी पक्षबांधणी
राज्यातील सत्तेचा फायदा घेऊन तीनही विधानसभानिहाय पक्ष बांधणी करणे गरजेचे आहे. पूर्वी असणाऱ्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र नव्याने नेतृत्त्व उभे करण्याचे आव्हान पक्षनेतृत्त्वापुढे आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये पक्षबांधणी केली तरच त्याचा महापालिका निवडणुकीत फायदा होईल.
पालिकेला सक्षम उमेदवारांचा अभाव
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका कधीही होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहेत. गेल्या महापालिकेत शिवसेनेने दुहेरी आकडा गाठला नव्हता. या निवडणुकीतही दुहेरी आकडा गाठणे अवघड दिसत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवारांचा अभावच स्पष्ट दिसत आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन त्यांना उभे करायची गरज आहे.