प्रभात वृत्तसेवा पुणे – नवले पूल परिसरातील अपघात थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे तातडीने राबवायच्या अल्पकालीन उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली असून, या उपाययोजना त्वरित अमलात आणाव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.नवले पूल येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इतर उपस्थित होते.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपाययोजनाबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगावदरम्यान उपाययोजना केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची बैठक निश्चित तारखेनुसार नियमित व्हावी, सेवा रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाच्या रुंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना मोहोळ यांनी दिल्या. कायमस्वरूपी उपाययोजना.. जांभूळवाडी ते वारजे रिंगरोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हे नवले पुलाजवळील अपघात कमी करण्यासाठीचे मुख्य कायमस्वरूपी उपाय असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. पीएमआरडीएकडून जांभूळवाडी ते वारजे रिंगरोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून त्याला गती देण्यात येईल. उन्नत कॉरिडॉरचा डीपीआर पूर्ण झाला असून हा अहवाल लवकरच मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. “बैठकीत सर्व यंत्रणांवर स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कोणत्या यंत्रणेने कोणते काम केले याचा आढावा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतला जाईल.” – मुरलीधर मोहोळ, खासदार या उपाययोजना तातडीनं राबविणार – स्पीड गन्सची संख्या तीनवरून सहा करणे – वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० वरून ३० कि.मी. – रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवणे – पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारणे – सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवणे