Gopichand Padalkar : “नाटक कश्याला करताय…”; रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर पडळकरांचा बोचरा वार, म्हणाले “त्यांच्या आजोबांनी…”
Gopichand Padalkar : एक्टिंग करायचं रोहित पवारांना माहिती आहे, असं पडळकर म्हणाले आहेत. या टीकेनंतर रोहित पवार त्याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Gopichand Padalkar : पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जहरी टीका केली आहे. केवळ नाटक करण्यापूरतं आमदार रोहित पवारांचं आंदोलन आहे. एक्टिंग करायचं रोहित पवारांना माहिती आहे, असं पडळकर म्हणाले आहेत. या टीकेनंतर रोहित पवार त्याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सांगलीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केले. “नाटक कश्याला करताय, हे चित्रपटाचे शूटिंग आहे का ? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे का ? ” अशा शब्दांत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये : पडळकर
रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खरोखरच संघर्ष करायचा असेल, तर राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवावे, असे आव्हानही पडळकर यांनी यावेळी बोलताना दिले. ते म्हणाले “सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आंदोलनस्थळी कडक सुरक्षा ठेवावी आणि रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये. त्यांना एक-दोन महिने आंदोलनाला बसू द्या, मग खरी भूमिका समोर येईल.” 
Gopichand Padalkarहेही वाचा : Donald Trump: “‘त्यांच्या’कडूनच ड्रोनद्वारे भारतीय जहाजावर हल्ला, हे खपवून घेणार नाही” ; ट्रम्पने हल्ल्याचे खापर इराणवर फोडले
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान यांच्याच साखर कारखानदारीमुळे झाले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा, असे म्हणत रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लुटलंय, असेही पडळकर म्हणाले.
आंदोलनाचा दुसरा दिवस
राज्य सरकारने राज्यतील शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्यातील काही अटींमुळे अनेक शेतकरी वंचित राहतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह जाचक अटी रद्द करण्यासाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली असून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.





