नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेदरम्यान टी. नटराजनच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाबा झाल्याच्या आनंदात नटराजनलाही मायदेशी यायचे होते. मात्र, त्याला तशी परवानगी देण्यात आली नाही. मात्र, आता कर्णधार विराट कोहलीला पालकत्व रजेवर मायदेशी परतण्याची परवानगी दिली जाते. कोहलीला एक तर अन्य खेळाडूंना दुसरा न्याय का, असा सवाल विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळून कोहली मायदेशी परतला आहे. त्याने पालकत्व रजा घेत मायदेशी परतण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ पहिला सामना खेळून तो मायदेशी दाखल झाला.
जर कोहलीला अशी परवानगी दिली जाते. मात्र, नटराजनला तशी परवानगी मिळाली नाही. आयपीएल पार पडल्यावर त्याला थेट ऑस्ट्रेलियाला जावे लागले. आता तो आपल्या बाळाला थेट जानेवारीत पाहील. कोहलीसाठी एक तर नटराजनसारख्या नवख्या खेळाडूच्या बाबतीत दुसरा न्याय कशासाठी, अशीही विचारणा गावसकर यांनी केली आहे.
संघातील अनेक खेळाडूंना नियमच माहिती नसतात, तर काही खेळाडू नवीन असल्यामुळे काही गोष्टींची विचारणाही करत नाही. आयपीएलचे प्ले-ऑफचे सामने सुरू होते तेव्हा नटराजन याच्या घरी पाळणा हलला होता.
त्यानंतर नेटमध्ये सराव करणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला भारतामध्ये आपला नवजात मुलीला भेटायला पाठवण्यात आले नाही.
कोहलीला मात्र, लगेच परवानगी दिली जाते हा कोणता न्याय आहे, असा सवालही गावसकर यांनी केला.