पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका राज्यातील राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. दरम्यान, आज केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देत नेत्यांना खोचक सवाल देखील केला आहे.
सरकोली गावात जाहीर सभेत केसीआर यांनी, “गेल्या काही दिवसांत एक गोष्ट मला खटकते. आज देशाचं ध्येय काय आहे? काही आहे की विना ध्येयाचेच आपण भटकत आहोत? काय चाललंय या देशात? प्रत्येक भारतीयानं यावर विचार करायला हवा. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली. ७५ वर्षं हा काही कमी काळ नाहीये”, असे यावेळी म्हटले.
पुढे त्यांनी, “निवडणुका होत असतात. कुणी ना कुणी जिंकतच असतं. किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मला एक पक्ष सांगा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली नाही. काँग्रेसनं ५० वर्षं राज्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाला तुम्ही संधी दिली. करायचं असतं, तर यापैकी कुणीतरी एकानं तरी काम केलं असतं. तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?”, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.
तसेच “हे सगळे एवढंच सांगतायत की महाराष्ट्रात तेलंगणासारख्या योजना राबवल्या तर महाराष्ट्राचं दिवाळं निघेल. होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. आम्ही कुठून आणतोय पैसे? सगळे उलट-सुलट सांगतायत. विचित्र काहीतरी बोललं जातंय”, असे केसीआर यांनी यावेळी म्हटले.
राज्यातील राजकीय नेत्यांविषयी बोलताना केसीआर यांनी “इथले राजकारणी मला म्हणतायत इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. मला एक कळत नाहीये, आम्ही आत्ता कुठे महाराष्ट्रात सुरूवात केली आहे. पण या सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालताय? कोणताच पक्ष आम्हाला सोडत नाहीये. भाजपा, काँग्रेस बोलतायत. काँग्रेसनं आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं. भाजपानं आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं. या टीम कुठून येतायत? आम्ही शेतकरी, मागास वर्गाची टीम आहोत. बीआरएस हा एकमेव पक्ष आहे ज्यानं घोषणा केली अब की बार, किसान की सरकार. आता या लोकांना भीती वाटत आहे. शेतकरी बीआरएसशी जोडले जातायत म्हणून हे सगळं बोलतायत. बीआरएस ही फक्त तेलंगणा किंवा महाराष्ट्रापर्यंत मर्यादित पार्टी नाही”, या शब्दांत केसीआर टोला लगावला.
त्याचबरोबर “भारतात ४१ कोटी एकर शेतीयोग्य जमीन आहे. आपल्याकडे १ लाख ४० हजार टीएमसी पाणी देईल इतका पाऊस पडतो. त्यातल्या निम्म्या पाण्याची वाफ होते. पण निम्मं पाणी आपल्याला वापरायला उपयोगी आहे. त्यामुळे योग्य नियोजन केलं, तर प्रत्येक एकरमध्ये भरपूर पाणी देता येईल”, असेही केसीआर यांनी यावेळी सांगितले.