Menstrual Hygiene Day: मासिक पाळीत स्वच्छता का महत्त्वाची? ‘या’ छोट्या चुका ठरू शकतात संसर्गाचे कारण
Menstrual Hygiene Day तज्ज्ञांच्या मते, पीरियड्समध्ये योग्य स्वच्छता न पाळल्यास बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Menstrual Hygiene Day: दरवर्षी २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आजही अनेक महिला पीरियड्सदरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे संसर्ग, त्वचेचे त्रास आणि इतर आरोग्य समस्या वाढण्याचा धोका निर्माण होतो.
तज्ज्ञांच्या मते, पीरियड्समध्ये योग्य स्वच्छता न पाळल्यास बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड वेळेवर बदलणे. डॉक्टरांच्या मते, दर ४ ते ६ तासांनी पॅड बदलणे गरजेचे असते, जरी रक्तस्राव कमी असला तरीही. जास्त वेळ एकच पॅड वापरल्यास जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. जास्त रक्तस्राव होत असल्यास त्यापूर्वीही पॅड बदलणे आवश्यक असते.
पीरियड्सदरम्यान खासगी भागाची स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा कोमट पाण्याने स्वच्छता केल्यास घाण आणि बॅक्टेरिया साचत नाहीत. मात्र जास्त केमिकल असलेले किंवा सुगंधी प्रॉडक्ट वापरणे टाळावे. यामुळे त्वचेची जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते. स्वच्छतेनंतर तो भाग कोरडा ठेवणेही गरजेचे आहे.
पॅड किंवा टॅम्पोन बदलण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. अनेकदा घाईत हात न धुतल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. हातांवरील जंतू शरीरात जाऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

world menstrual hygiene day
या काळात आरामदायक आणि स्वच्छ कापडी अंतर्वस्त्र वापरणे फायदेशीर ठरते. कापसाचे कपडे हवा खेळती ठेवतात आणि घाम कमी होण्यास मदत करतात. खूप टाइट किंवा सिंथेटिक कपडे वापरल्यास रॅशेस आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
ज्या महिला टॅम्पोन वापरतात त्यांनी ते वेळेवर बदलणे खूप महत्त्वाचे आहे. जास्त वेळ टॅम्पोन वापरल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात आणि गंभीर संसर्ग होऊ शकतो.
तसेच या काळात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट राहिल्यास थकवा आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. नारळपाणी, फळांचे ज्यूस आणि हेल्दी ड्रिंक्स शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात.
जर पीरियड्सदरम्यान खाज, जळजळ, तीव्र दुर्गंधी, जास्त वेदना किंवा असामान्य रक्तस्राव जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे संसर्गाचे लक्षण असू शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आणि मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता पाळणे अत्यंत आवश्यक आहे.





