Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथित मतचोरीच्या आरोपांवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मतचोरी घडत असल्याचे त्यांना वाटते. तसे असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल त्यांनी केला. बिहारमधील प्रचारसभांत बोलताना शहा यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली. राहुल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नुकतीच मतदार अधिकार यात्रा काढली. त्या यात्रेचा उद्देश बिहारमधील गरीब जनतेच्या जीवनात कुठली सुधारणा घडवण्याचा नव्हता. तर, घुसखोरांचे रक्षण करणे हा होता. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी औद्योगिक कॉरिडॉरची उभारणी करत आहेत. तर, दुसरीकडे विरोधक मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरांचे कॉरिडॉर उभारत आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सरकार होते. त्यावेळी दहशतवादी त्यांच्या इच्छेनुसार आपल्या भूमीवर हल्ला करत होते. त्याउलट आताची स्थिती आहे. आता आपण दहशतवाद्यांवर त्यांच्या घरात घुसून प्रहार करत आहोत, असे ते म्हणाले. बिहारमधील यावेळच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मी आधीच सांगू शकतो. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे, असा दावाही शहा यांनी केला.