Kamal Nath| गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काॅंग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशावेळी प्रश्न पडतो की कमलनाथ ( Kamal Nath ) काॅग्रेस सोडून भाजपमध्ये का चालले आहेत? यामागे निश्चितच काही कारणे असू शकतात. यापैकी चार मोठी कारणे असू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ ( Nakul Nath ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज कमलनाथ हे त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ यांच्यासोबत दिल्लीत पोहोचले आहेत. कमलनाथ यांचे वय 77 वर्ष असून त्यांनी तब्बल 44 वर्ष काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे.
पहिले कारण –
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी 1984 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर शीख विरोधी दंगल उसळली. या दंगलीत जमावाला भडकावल्याचा आरोप कमलनाथ यांच्यावर आहे. याचप्रकरणी कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. दिल्लीत भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र, यापूर्वी वेगवेगळ्या तपास आयोगांच्या अहवालात कमलनाथ यांची शीख दंगलीत भूमिका आढळून आली नाही. या प्रकरणाच्या कोणत्याही चौकशीला मी सामोरे जात असल्याचे कमलनाथ यांनी यापूर्वी म्हंटले होते. परंतु 6 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. यात कारवाई होण्याची भीती असू शकते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, हाही त्याचा एक भाग असू शकतो अशी राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दुसरे कारण –
कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध 2020 मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने रतुललाही अटक केली होती. तब्बल 354 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे. रतुल पुरी संचालक असलेल्या मोझवेअर कंपनीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे 354 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयकडून ऑगस्ट 2019 मध्ये याप्रकरणी प्रथम एफआयआर दाखल करण्यात आला होता.
यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रतुल यांना अटक करण्यात आली असून ते आता जामिनावर आहेत. चार वर्षांनंतर ऑगस्ट 2023 मध्ये ईडीने त्याच प्रकरणात रतुल यांचे सहकारी नितीन भटनागर यांना अटक केली. मात्र, 2012 मध्येच या कंपनीच्या संचालकपदावरून वेगळे झाल्याचे रतुलने तपास यंत्रणेला सांगितले आहे. या प्रकरणात रतुलची आई नीता आणि वडील दीपक पुरी यांनाही ईडीने आरोपी केले आहे. दरम्यान, कमलनाथ यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर याप्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता असू शकते.
तिसरे कारण –
मुख्यमंत्री झाल्यानंतर कमलनाथ यांनी आपल्या मुलाला नकुल नाथ यांना छिंदवाडा खासदारकीची निवडणूक लढवून जिंकवले. कमलनाथ यांना नकुलला राजकारणात प्रस्थापित करायचे आहे. आता काँग्रेसने साथ सोडल्यानंतर कमलनाथ यांना नकुलची सर्वाधिक चिंता आहे. आता कमलनाथ निवडणूक लढवणार नसून नकुलनाथ छिंदवाडा येथून खासदारकीचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कमलनाथ यांचे काॅंग्रेसमध्ये 40 वर्ष काम आहे. मात्र नकुलनाथ यांचे अजून प्रस्थ निर्माण झालेले नाही. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये त्यांना जास्त वाव दिसत नाही. कमलनाथ यांना त्यांच्या मुलाच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि व्यवसायासाठी सुरक्षित राजकीय व्यासपीठ हवे आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अपेक्षित गोष्टी होऊ शकतात असा त्यांचा विश्वास असू शकतो, हे देखील त्यांच्या भाजप प्रवेशाचे मोठे कारण असू शकते.
चौथे कारण –
गेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा पराभव झाला. कमलनाथ हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे निवडणुकीच्या पराभवाचे खापर कमलनाथ यांच्या डोक्यावर फोडण्यात आले. तर दुसरीकडे राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतही काॅंग्रेसचा पराभव झाला मात्र येथे अशोक गेहलोत, भूपेश बघेल यांच्याबाबत गांधी घराण्याने तशी भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे कमलनाथ हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले.
याबाबत कमलनाथ यांनी थेटपणे कधी बोलून दाखवले नाही. मात्र पक्षांतर्गत सर्व नाराजी दिसून येत होती. दुसरीकडे कमलनाथ यांच्या माहितीशिवाय जितू पटवारी यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये कमलनाथ यांची ओळख आहे. पण, खासदारकीच्या पराभवानंतर त्यांचे महत्त्व दिल्लीपासून ते मध्यप्रदेशापर्यंत घटले असल्याचे बोलले जात आहे. गांधी कुटुंबही आता कमलनाथ यांच्या फारसे जवळचे राहिलेले नाही, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे नाराजीत काॅंग्रेसमध्ये राहण्यापेक्षा भाजपची वाट धरावी असे त्यांना वाटले असावे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
कमलनाथ यांचा भाजपला काय फायदा ?
दुसरीकडे असाही प्रश्न निर्माण होतोय की, भाजपला कमलनाथ यांचा काय फायदा होऊ शकतो. त्याचे याबाबतही वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. मात्र कमलनाथ हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यावर विश्वास असलेले त्यांचे अनेक कट्टर कार्यकर्ते आहेत. तर 15 हून जास्त आमदार देखील त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.
म्हणजे कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश केल्यास साहजिकच त्यांच्यासोबत अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात. त्याचा भाजपला फायदाच होणार आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात काॅंग्रेसमधील आमदार भाजपात आल्याने सध्या पक्षात असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीलाही भाजपला समोरे जावे लागू शकते.