नवी दिल्ली – बिहारमध्ये मतदान होत असताना, त्याच्या तीन दिवस आधी हरियाणातून चार विशेष रेल्वेगाड्या बिहारकडे धावल्याने कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि भाजपवर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. सिब्बल यांनी हा प्रकार सिस्टमॅटिक धांदलेबाजीचा नमुना असल्याचे सांगत निवडणुकीपूर्वीचा हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिले की, या रेल्वेगाड्यांचे बुकिंग कोणी केले आणि भाडे कोणी भरले, हे देशासमोर स्पष्ट करावे. सिब्बल यांनी दावा केला की, या ट्रेनमधून बिहारला गेलेले हजारो लोक हे व्यावसायिक मतदार आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या मतदारसंघात मतदानासाठी नेले जातात. त्यांच्या मते, या लोकांकडे बनावट ओळखपत्रे असू शकतात, ईव्हीएम आणि मतदार यादीतील फेरफारात भाजप निष्णात आहे, आणि निवडणूक आयोग त्यांना अप्रत्यक्ष मदत करत आहे. या विशेष गाड्यांचा खर्च सरकारने केला की पक्षाने, यावर सिब्बल यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. जर सरकारने खर्च केला, तर जनतेच्या पैशावर ही राजकीय सोय का? आणि जर सरकारने नाही, तर कोणत्या पक्षाने? आम्हाला माहिती आहे हा खर्च भाजपनेच केला आहे. सिब्बल म्हणाले की, हे लोक 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान बिहारमध्येच होते. त्यांना कुठेतरी ठेवण्यात आले, खानपान देण्यात आले आणि त्यांनी मतदानात काम केले. आता प्रश्न असा आहे की, हे लोक परत आलेत का? परतीची ट्रेन का नव्हती?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सिब्बल यांनी आरोप केला की, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन या रेल्वेगाड्या चालवल्या गेल्या आणि त्यांना हरियाणा भाजप अध्यक्ष मोहन लाल व सरचिटणीस डॉ. अर्चना गुप्ता यांच्याशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले. सरकारकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांना थेट आवाहन केले.