जाधववाडी – काही महिने शांत बसलेल्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ज्यांना आजवर दुर्लक्षित केले आहे ते आज शहरभरात अनेक ठिकाणी उदरनिर्वाहाकरिता ही मंडळी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. प्रामुख्याने लहान बालक व ज्येष्ठ नागरिक सिग्नल्सच्या आसपास वाहनाच्या गर्दीत वीतभर पोटाची खळगी भरण्याकरिता धडपडत असतात. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने या व्यक्तींसाठी काही तरी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये, चौकांमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यांवर अनेक भटक्या व्यक्ती भ्रमंती करत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी येथे तेथे भीक मागत आहेत. परंतु त्यांच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत. जे आहेत ते देखील अस्वच्छ आहेत. तोंडाला मास्क नाही त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची प्रशासनाने व्यवस्था करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षभरांपासून करोना मोठ्या प्रमाणात थैमान घालत असताना अनेकजण आपल्या जिवाला मुकले आहेत. त्यामुळे रस्त्याने फिरणाऱ्या अशा व्यक्तींना धनी कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत परंतु करोनाने त्यांचेही कंबरडे मोडले आहे. अनेक सेवाभावी संस्थांनी ह्यात पुढाकार घ्यावा, असे मत समाजातील एका स्तरातून व्यक्त केले जात आहे.
उदरनिर्वाहासाठी कायपण असे ब्रीदवाक्य असलेल्यांना ह्या कठीण काळात कुणाचा हात आहे. यावर चर्चासत्र होण्याची आवश्यकता आहे. अनेकजण मळक्या अस्वच्छ अवस्थेत असलेल्या कपड्यात महापालिका हद्दीत वास्तव्य करीत आहेत. करोनाकाळात सर्वत्र हिंडत आहे. त्यांच्यावर किमान ह्या कठीण काळात तरी महापालिकेने जबाबदारी घ्यावी, अशीही मागणी काही नागरिकांतून होत आहे.