कोंढवा : अतिशय संथगतीने काम सुरु असलेल्या कात्रज- कोंढवा मार्गावर इस्कॉन मंदिराच्या जवळ सोमवारी सकाळी दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील शिक्षिका महिलेचा वाहतुक कोंडीमुळे वेळेत मदत न मिळाल्याने अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून हा रस्ता अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. या रस्त्यावर आतापर्यंत मोठं मोठे अपघात झाले असून यात शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. खडीमशीन चौकाकडून कात्रजच्या दिशेने दुचाकीवरून महिला जात असताना मोठ्या कंटेनरच्या चाकाखाली सकाळी साडे सातच्या दरम्यान येऊन अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रथमदर्शनी नागरिकांनी दिली. रमा कापडी (वय ५३) रा. कात्रज कोंढवा रोड असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलचा शिक्षिकेचे नाव आहे. ‘आज कोंढवा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे, त्यामुळे रस्ता तळ्याजवळ वळविण्यात आला असल्याने रोडचा अंदाज न आल्यामुळे आमच्या भगिनी जे.एस.पी.एम मधील शिक्षिका रमाताई कापडी यांचे अपघाती निधन झाले. फक्त त्यांच्यापर्यंत ट्रॅफिक जाम झाल्यामुळे कोणालाच तेथे पोहचता आले नाही आणि अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे प्राण गेले. याला जबाबदार कोण ?’ असा सवाल माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. दरम्यान, हाकेच्या अंतरावर त्यांच्या भावाचे हॅास्पिटल असताना देखील ३०/३५ मिनिटे वाहतुककोंडीमुळे तिथपर्यंत पोहचता न आल्याने त्यांच्या अति रक्तस्त्राव झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले.