मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबईत भाजपनं ठाकरेसेनेचा धुव्वा उडवत जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. काँग्रेस, शिवसेनाच नाही तर आरपीआयनेही मुंबईचं महापौरपद पटकावलं होतं. मात्र आता भाजपनं 90 पार मुसंडी मारली. यंदा एकनाथ शिंदेंच्या साथीनं उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि काही प्रमाणात मराठी मतांसह मुंबईत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झालाय. साहजिकच गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच सत्तेत आल्यानं भाजपची जबाबदारी वाढलीय, हे मात्र निश्चित…. पुण्यात गुंडांना कौल; आंदेकर कुटुंबातील दोघींचा विजय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे महापालिकेच्या प्रभाग 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना उमेदवारी देण्यात आली. आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्यानं या निर्णयावर जोरदार टीका होत होती. मात्र आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या गुंड लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरुंगात असतानाही त्यांच्यावर पुणेकरांनी मतांचा अक्षरशः वर्षाव केलाय. तर लोकांनीही रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांना पराभूत करत गुंडांना कौल दिला. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीतही जनता गुंडांच्याच मागे उभे राहताना दिसत असल्याचे पुण्यात पाहायला मिळालयं. भाजप शहरांचा कारभारी ! राज्यभरात प्रचंड राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या, अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या २९ महापालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले. सर्वांधिक ठिकाणी बाजी मारत भाजपने उत्साहात विजयाचा गुलाल उधळला. तो पक्ष राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या गेलेल्या अनेक शहरांचा कारभारी बनला. केवळ विरोधकांचा विचार करता कॉंग्रेसची कामगिरी तुलनेने समाधानकारक ठरली. मागील अनेक वर्षे राज्याच्या राजकारणावर पवार आणि ठाकरे या राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, त्या घराण्यांच्या प्रभावाला आताचे निकाल आव्हान देणारे ठरले आहेत. पुणे महापालिकेत भाजपचा एकहाती सत्तेचा नवा विक्रम महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात महाविकास आघाडीत पडलेली फूट आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीच्या समोर उभे केलेले उमेदवार यामुळे झालेले मतविभाजन भाजपच्या पथ्थ्यावर पडले असून भाजपने शंभरी पार केली आहे. महापालिकेच्या इतिहासात भाजपने एकहाती सत्तेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मात्र, त्याचवेळी पुण्यात मागील काही निवडणूकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागेल्या काॅग्रेसला पुण्यात पुन्हा एकदा संजिवनी मिळाली असून पक्षाने या निवडणूकीत तब्बल १६ जागांवर विजय मिळविला आहे. कुठे गुलालाची उधळण, तर कुठे स्मशानशांतता! निकालाच्या दिवशी विजयाच्या मिरवणुकीला परवानगी नसल्याने जिंकलेल्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह पक्ष निवडणूक कार्यालयाच्या बाहेर गुलाल उधळून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी पक्षाचा झेंडा फडकवून तसेच गुलाल उघळून आनंद साजरा केला. विजयानंतर ठिकठिकाणी मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र निकालानंतर धक्का बसलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. या दोन्ही कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या आधीच्या आणि निवडणुकीच्या काळात प्रचंड रेलचेल होती. अजित पवार यांनी तर पुण्यातच ठिय्या मारून रणनिती आखली होती. मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने पक्षात नाराजी पसरली होती.दुसऱ्या बाजूला भाजप कार्यालयासमोर मात्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. महापालिका आखाड्यात विरोधकांचा खेळ नक्की कुणी बिघडवला? महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शहरात राजकीय गोंधळाचे वातावरण दिसत होते. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची सगळी हवा काढून घेतली. यामुळे निवडणूक पूर्णत महायुतीने आपसातच लढली आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आपली उपस्थिती देखील पूर्णपणे दाखवू शकली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संगनमत केल्यानंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच उरली होती. परंतु हे दोन्ही पक्ष शहरात आघाडी करुन उमेदवार रिंगणात उतरवू शकले नाहीत. पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांना पक्षाला शहरात अक्षरशः वार्यावर सोडून दिले होते. ‘महाविजया’नंतर पंतप्रधान मोदींनी मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे, हेच या निकालातून दिसून येते. हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे. महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याच वेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले,” असे म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढवले आहे. ‘ज्यांनी माझं घर पाडलं, त्यांना आज महाराष्ट्रानं सोडलं’ बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला पाडला. यावरून कंगना राणौतने न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तिच्या घरावर कारवाई केली होती. त्या घटनेची आठवण काढत कंगणा म्हणाली, “ज्या लोकांनी मला शिव्या घातल्या. मला धमकी दिली. माझं घर पाडलं. मला अत्यंत वाईट बोलले, मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली. आज महाराष्ट्रानं त्यांना सोडलं आहे. मला आनंद आहे की महिलांचा द्वेष करणाऱ्यांना, धमक्या देणाऱ्यांना, या माफियांना जनता जनार्दनाने त्यांची जागा दाखवली,” अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. ईडीची धाड! नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटे अन्… बेकायदेशीर वाळू उपसा आणि गौण खनिजांच्या तस्करीप्रकरणी झालेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांच्या हाती घबाड लागले आहे. चक्क नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटे पाहून तपास अधिकारीही थक्क झाले. ही कारवाई बीजू जनता दलाचे नेते आणि मोठे कंत्राटदार हृषिकेश पाढी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर करण्यात आली आहे. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात ही छापेमारी करण्यात आली. त्यांच्या बरहामपूर, लांजीपल्ली आणि जयप्रकाश नगर येथील निवासस्थानांसह एकूण २० ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत २ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, पैशांची मोजणी अजूनही सुरू आहे. रोख रकमेसोबतच महागड्या गाड्या आणि मालमत्तेची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर नोबेल पुरस्कार मिळाला. व्हाईट हाऊसमध्ये व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मारिया कोरिना मचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार दिल्याचे म्हटले जात आहे. गेल्या महिन्यात मचाडो यांना व्हेनेझुएलातील हुकूमशाहीविरुद्धच्या अटळ लढ्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे. त्या बदल्यात ट्रम्प यांनी वारंवार नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली होती.