पुणेः राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी १९९५ ते १९९७ साली अल्प उत्पन्न दाखवून शासनाकडून सदनिका मिळवल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची तुरुंग आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांचे मंत्रीपदही जाणार आणि आमदारकीही जाणार असे बोलले जात आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे. आता या प्रकरणावर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत माझ्याकडे आली नाही, प्रत आल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले होते. यावर सुषमा अंधारेंनी नार्वेकरांचं म्हणणं म्हणजे धादांत लबाडी आहे, असा खोचक निशाणा त्यांच्यावर साधला आहे. वास्तविक निकालाची प्रत न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, मात्र कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी जो कालावधी लागत आहे तो फिलर नार्वेकर भरून काढत आहेत, असे अंधारे म्हणाल्या आहेत. माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत. मात्र 38 पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे. कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे ? असे देखील त्या म्हणाल्या आहेत. यासंबंधीची पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या गेल्या अनेक महिन्यांपासून मस्साजोग गावातील सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. मंत्री धनजंय मुंडेंवर भष्ट्राचाराचे आरोप होत आहेत. परिणामी राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी वाढल्या असाताना आता त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कागद पत्रांची फेरफार करून मिळवलेल्या सदनिका प्रकरणाची भर पडली आहे. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.