पुणे-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला “टीईटी’ परीक्षेच्या निकालातील घोटाळ्यानंतर अद्याप शहाणपण आलेले नाही. शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र व मॅन्युअल टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रेही बोगस आढळून येत आहेत. टायपिंगच्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत परीक्षा परिषदेला काहीच माहिती अपडेट नसल्याची बाब उघड झालेली आहे. यावरुन परीक्षा परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. दरम्यान, बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एजंटाच्या रॅकेटचा पर्दाफाश कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परीक्षा परिषदेच्या माध्यमातून विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या शुल्कातून परिषदेकडे कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा होत असतो. काही परीक्षांच्या प्रमाणपत्र पडताळणीचे रेकॉर्ड मात्र परीपूर्ण ठेवण्यात परीक्षा परिषद अपयशी ठरली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील तीन लिपिकांची टायपिंगची प्रमाणपत्रे बोगस आढळल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. शासकीय कार्यालयात नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या टायपिंगच्या प्रमाणपत्रांची परीक्षा परिषदेकडून जलद गतीने पडताळणी होत नसल्याची व त्याबाबतचे अहवालही संबंधित कार्यालयाला लवकर मिळत नाही, अशी काही कार्यालयांनी ओरडही सुरू केली आहे. पुणे बोर्डात 49 लिपिकांची भरती झाली. यातील काही लिपिकांची टायपिंगची प्रमाणपत्रे बोगस असल्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
टायपिंगची प्रमाणपत्रेही बोगस सापडू लागली असून, ही बाब गंभीर आहे. परीक्षा परिषदेने बोगस प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा शोध लावण्याच्या दृष्टीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची आवश्यक आहे. अन्यथा आगामी कालावधीत बोगस प्रमाणपत्रांची परंपरा कायमच राहण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
आत्तापर्यंत किती व कोणकोणत्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या टायपिंगंच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीची प्रकरणे दाखल झाली. त्यातील किती प्रमाणपत्रांची पडताळणी झाली, किती प्रमाणपत्रे पडताळणीसाठी प्रलंबित आहेत, किती प्रमाणपत्रे बोगस आढळली आहेत, याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. टायपिंगच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी रजीस्टर असतानाही त्यातील नोंदीची माहिती देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला. वस्तुनिष्ठ माहिती सतत दडवून ठेवली जात असल्याने एकंदरीतच परीक्षा परिषदेच्या कारभाराबाबतच साशंकता निर्माण होऊ लागली आहे.