दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

पुणे – राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्याचवेळी दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. दोन लाखांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण, दोन लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्यासाठी कोणती योजना जाहीर केली जाईल याची प्रतीक्षा आहे. याबाबत शासनाची कुठलीच हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दीड लाखांपर्यंत दिलेल्या पीक कर्ज माफीला उत्तर देताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असे आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केले होते. निवडणुकीनंतर याच तिन्ही पक्षांनी सरकार स्थापन केले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
विरोधकांनी देखील हा मुद्दा लावून घेतला. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दोन लाखांपर्यंत पीक कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याचबरोबर दोन लाखांपेक्षा जास्त गरज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.





