अटी शर्तींसह कंपन्यांना परवानगी; बांधकाम क्षेत्रालाही दिलासा
पिंपरी – करोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योगांमधील “खडखड’ गेल्या साठ दिवसांपासून थांबली होती. त्याला आजपासून (सोमवार) गती मिळणार आहे. काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तर बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला असून, शहरातील बांधकामेही आजपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
करोनाच्या संकटामुळे 21 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 22 मार्चपासून शहरातील संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची चाके थांबली होती. लॉकडाऊन तीनमध्ये अत्यावश्यक सेवांमधील उत्पादनाला परवागी देण्यात आली होती. मात्र इतर व्यवसाय, उद्योग बंदच होते. गत आठवड्यामध्ये राज्य शासनाने काही अटी व शर्तींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. शहरात छोटे-मोठे मिळून किमान दहा हजारांहून अधिक कंपन्या आहेत. यामध्ये 4 ते 5 लाख कामगार काम करत आहेत. या सर्वांवरच मोठे संकट गेल्या दोन महिन्यांपासून ओढावले होते.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर पालिका व जिल्हाधिकारी पातळीवरून या कंपन्यांना परवाने देण्यास सुरुवात झाली आहे. काही जणांना परवाने मिळाल्यामुळे सोमवार दि. 18 पासून शहरातील बहुतांश कंपन्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपन्या सुरू होणार असल्या तरी त्यांना करोनासंदर्भातील अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. 33 टक्के कामगारांसह कंपन्या चालू कराव्या लागणार असून, कामावर येणाऱ्या कामगारांसाठी बसची सोय करावी लागणार आहे. कंटेन्मेंट झोनमधील कामगारांना कामावर घेता येणार नाही. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही वापर करावा लागणार आहे.
कंपन्यांसोबत शहरातील काही बांधकाम प्रकल्पांनाही परवानगी देण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्प सुरू करताना कामावर असलेल्या कामगारांची संपूर्ण जबाबदारी ही बांधकाम व्यावसायिकांवर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कामावरील प्रत्येक कामगाराचे तीनवेळा तापमान चेक करावे लागणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. बंधने असली तरी काम सुरू होत असल्याचे समाधान कामगार आणि उद्योजकांमधून होत आहे.
कामगारांची अडचण भासणार
बांधकाम क्षेत्रासह कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार हे बहुतांश परप्रांतीय असून यातील अनेक कामगारांनी आपले घर गाठले आहे. तर काहीजणांनी गावी जाण्यासाठी परवानगी घेतली आहे. पुढील दहा दिवसांत शहरातील सुमारे एक लाखाहून अधिक मजूर त्यांच्या प्रांतात जाणार आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रासह कंपन्यांनाही मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार आहे. यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झाला आहे.
वेबवरून परवानगी घ्या
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या उद्योजकांना आपले कारखाने सुरू करावयाचे आहेत त्यांना राज्य शासनाच्या वेबसाईटवरून परवानगी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. त्यामुळे शहरातील उद्योजकांना वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.