थंडी वाढल्याने काऱ्हाटी, सुपेत रब्बीला फायदा
काऱ्हाटी -सध्या वातावरण बदलाचा फटका मानवासह शेतपिकांना बसला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून असलेली थंडी रब्बी पिकांना फायद्याची ठरत आहे. काऱ्हाटी, सुपे परिसरात गहू ओंब्या धरण्याच्या तर हरभरा घाटे फुलोरा धरण्याच्या अवस्थेत आहे.
गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा स्थिरावला आहे. गार वाऱ्यामुळे सुपे परिसर गारठला आहे. वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे. सकाळपासून वातावरणात असलेला गारठा अन् दिवसभर गार वाऱ्याची झुळूक यामुळे हुडहुडी भरली आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात बऱ्याचवेळा चढ-उतार झाल्या आहे. नोव्हेंबर व डिसेंबरच्या मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झालेने थंडी गायब झाली होती, त्यामुळे तापमानात मोठे बदल झाले होते. परिणामी फारशी थंडी जाणवत नव्हती; परंतु या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान खाली येत असल्याने थंडी वाढली होती.
परंतु गेल्या दोन-तीन दिवसांत गारठ्यामध्ये अधिकच वाढ झाली आहे. तापमानाने नीचांक गाठला असल्याने बाल्यावस्थेत असलेल्या रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल, यात प्रामुख्याने गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी मदत होईल.
पिकांना थंडीही पोषक ठरेल व थंडी अशीच राहिल्यास उत्पादन वाढीस याचा निश्चितच फायदा होईल. थंडी कमी अधिक झाल्यास त्याचा फायदा होणार नाही, अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.