मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकत्याच ‘Curly Tales’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विचारलेल्या एका खास प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या या मुलाखतीत, अमृता फडणवीस यांना राजकारणात येण्याबद्दल विचारले असता, त्यांनी राजकारणात कोणताही रस नसल्याचे स्पष्ट केले. त्या बँकिंग, समाजसेवा आणि गायन क्षेत्रात आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि भावनिक उत्तर दिले. “देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी इतके मोठे काम केले आहे की मला एक दिवसासाठीही मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही, माहीत नाही. त्यांनी पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.” यापुढे उत्तर देताना त्या म्हणाल्या, “तरीही, जर मी एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले, तर मी देवेंद्र फडणवीस आणि मुलगी दिविजा यांच्यासह एका सुंदर ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन,” असे भावनिक उत्तर त्यांनी दिले. यावेळी त्यांना सर्वाधिक राग कशाचा येतो हे विचारले असता, त्यांनी विश्वासघात करणाऱ्या आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांचा सर्वाधिक राग येत असल्याचे स्पष्ट केले. समोर येऊन प्रामाणिकपणे वागावे, पण विश्वासघात टाळावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.