डॉ.राजू गुरव – राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. शिक्षकांची शिकविण्याव्यतिरिक्तच्या अनावश्यक कामातून सुटकाही करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी जिव्हाळ्याची भावना निर्माण करण्यासाठी वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याबाबत सक्ती करण्याचा अजब “घाट’ शिक्षण विभागाने घातला आहे. याला राज्यातील शिक्षक संघटनांकडून तीव्र विरोधही होऊ लागला आहे. संघटनांचा विरोध डावलून शिक्षण विभाग वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याबाबत शाळांना सक्ती कशी काय करु शकतो, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची जुलैमध्ये बैठक झाली होती. यात शिक्षण विभागाच्या दृष्टीने काही सूचना देण्यात आल्या होत्या. शाळा व महाविद्यालयांची बायोमेट्रिक हजेरी व वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याबाबतच्या विषयांवर चर्चा झाली होती. त्यानुसार राज्य शासनाने कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांना शिकवित असलेल्या शिक्षकांची माहिती व्हावी, त्यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी “आपले गुरुजी’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांचे फोटो वर्गाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शासनस्तरावरुन अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून विविध अधिकाऱ्यांना आदेशही बजाविण्यात आले आहेत.
राज्यात विद्यार्थी संख्या वाढतेय. त्या तुलनेत शाळांची संख्या वाढलेली आहे. मात्र त्या प्रमाणात शिक्षकांची पुरेशी भरती झालेली नाही. राजकीय पुढारी मंडळी प्रामुख्याने मोठमोठ्या शाळा, शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत. विनाअनुदानित वरुन अनुदानित शाळांमध्ये त्यांचे टप्प्या टप्प्याने रुपांतरही होत असते. यातील संस्थाचालक आपल्या जवळच्या नातलगांना शाळांमध्ये शिक्षक पदावर नोकऱ्या लावतात. यातील काही जण केवळ पगारासाठीच असतात. यातील महारथींच्या नावावर अन्य दुसरीच मंडळी कामकाज करतात का, याबाबतही तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना फारशी जाग येत नाही. या प्रकारे वशिल्याने लागलेल्या शिक्षक मंडळीवर वचक ठेवण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना फारशी सवडच मिळत नाही. “टीईटी’ घोटाळ्यात मंत्री, अधिकाऱ्यांच्या नातलगांची नावे उघड होऊ लागलेली आहेत. ही शिक्षण विभागासाठी लाजिरवाणी बाब आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदार नोंदणीसह अन्य मोहीम, विविध प्रकारचे सर्वेक्षण, प्रशिक्षण यांसारख्या कामात शिक्षकांना गुंतवून ठेवले जातात. या अतिरिक्त ताण-तणावामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फारसा वेळ उपलब्ध होत नाही, अशी ओरड शिक्षक संघटनांकडून सतत सुरुच असते. शिक्षकांनी शाळांमध्ये नियमितपणे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नीट लिहिता, वाचता तरी यावे, यादृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत, अशी अपेक्षा पालकांची आहे.
काही शिक्षक प्रमाणिकपणे काम करतात तर काही कामचूकारपणाही करतात. ही बाब खरी आहे. शाळांमध्ये कोण कोण शिक्षक कार्यरत आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना असलीच पाहिजे. शिक्षकांची ओळख ही त्याच्या शिकविण्यातून झाली पाहिजे. वर्गात फोटो लावून शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना फारसा काही फायदा होईल, असे वाटत नाही. त्यामुळे शासनाने नको त्या आदेशाची शाळांनी अंमलबजावणी करावी, यासाठी हट्ट धरणे योग्य नाही. शैक्षणिक गुणवत्तेचा विकासात्मक कायापालट करण्यासाठ शिक्षकांना अधिकाधिक प्रोत्साहित करण्याची खरी गरज आहे.