नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये विकासकामांचे उद्घाटन केले, यावेळी त्यांनी काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात, अशी खरमरीत टीका केली.
“रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, विभाजनाच्या राजकारणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळत होतं का? पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणत असत त्यांनी गरिबांचे रेशन पचवले,” अशी टीकाही त्यांनी केली.
“देशाला दुखावणाऱ्या लोकांना देशवासियांना सहन करण्याची गरज नाही. काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. तसेच ते प्रभू रामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमान करून माफियांना आश्रय देते. तर याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे,” असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
राज्यातील जनतेने प्रभू रामाच्या भक्तांवर गोळी झाडणारी तालिबान समर्थक, जातीयवादी आणि वंशवादी मानसिकता सहन करू नये. मोदीजींनी देशात तिहेरी तलाक रद्द केला. पण समाजवादी पक्षाचे नेते तालिबानच्या कृत्यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या देशातील दहशतवाद्यांना आज कुठेही स्थान नाही, असेही आदित्यनाथ यांनी सुनावले.
“हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि सोनिया गांधींनी रामाचे अस्तित्व नाकारले,” असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.