कालीचरण महाराज सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
“नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल”, असे विधान कालीचरण महाराजांनी केले आहे.
यावेळी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यावरही त्यांनी भाष्य केले. “राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. राहुल गांधींना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहेत. हिंदू लोक हे राहुल गांधींच्या व्होटर बँकचे शत्रू आहेत. फालतू सेक्युलरिझम हिंदूंनी सोडून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे,” असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले आहे.
याआधी छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत देखील कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्याचवेळी त्याने महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेंना नमन केले होते. या घडामोडीनंतर छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केला होता. यानंतर कालीचरण महाराजला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. बिलासपूर कोर्टाने कालीचरण महाराजला जामीन मंजूर केला होता. कालीचरण महाराजच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी कडाडून विरोध केला, मात्र तरीही त्याला जामीन देण्यात आला होता.