ऐतिहासिक मोती तळे, मंगळवार तळी झाली निर्माल्य तळी
गुरूनाथ जाधव
सातारा – सातारा शहरातील विविध तळी व जलस्त्रोतांची उपयोगिता काय आहे. असा प्रश्न सातारकर नागरिक विचारत आहेत. ऐतिहासिक मोती तळे, मंगळवार तळयांना निर्माल्य तळे म्हणावे कि काय, असे चित्र आज तळयांच्या आवस्थेकडे पाहुन दिसत आहे. सातारा नगरपरिषदेच्या वतीने मंगळवार तळे तसेच मोती तळयांची स्वच्छता मोहीम केल्याचे अनेक दिवसापासुन पहायला मिळाले नाही.
या दोन्ही तळयांच्या अवस्थांमध्ये या स्वच्छता मोहीमांमुळे काही परिणामकारक बदल घडला असल्याचे आजवर तरी दिसले नाही. पाणी हे एक नैसर्गिक संसाधन असून सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. मानवाच्या शरीराच्या 70 टक्के वजनास पाणी कारणीभूत असते. पृथ्वी तलावरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी 97 टक्के पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त 3 टक्के पाणी हे गोड्या स्वरूपात असते.
या तीन टक्क्यातील 69 टक्के पाणी हे हिमशिखरांमध्ये गोठलेल्या स्वरूपात असते. 30 टक्के पाणी हे भूगर्भात असते व उर्वरित 1 टक्का पाणी भूपृष्ठावर उपलब्ध असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता ही बहुंतांशी भूजल स्त्रोतांवर अवलंबून आहे. त्यामुळे भुजल स्त्रोतांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. या जलस्त्रोतांच्या पाण्याची उपयोगिता उपयोजन करणे हे प्रशासनाचे आद्य कर्त्यव्य आहे. मात्र त्यामध्ये नियोजनाचा व व्यवस्थापनाचा अभाव दिसत असून त्याचा परिणाम भविष्यकालीन पाणीबाणीमध्ये दिसून येण्याची दाट शक्यता आहे. यासाठी आहे त्या जलस्त्रोतांचे संगोपण, संवर्धन व उपयोजन हि त्रीसुत्री राबविली पाहिजे.
सातारा शहरातील दोन्ही तळयांच्या पाण्याचा सातत्याने उपसा करून या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. शहरातील विविध बांधकाम करणार्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. त्यातुन पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न देखील मिळू शकते. याचबरोबर शहरातील बांगाना, आग लागल्यास अग्निशमन दलाला आवश्यक असणारे पाणी या तळयांमधील वापरता येऊ शकते. तसेच शहरात पालीकेच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांना देखील यातील पाणी वापरता येईल. यासाठी या दोन्ही तळयांमधील पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे करणे आवश्यक बनले आहे. याबाबत सातारा नगरपरिषदेने सकारात्मक पावले उचलून या तळयांच्या पाण्याची उपोगिता वाढविल्यास निश्चितच त्याचा सातारा वासीयांना लाभ होईल.
पाणी हे जीवन आहे मात्र त्याचा विसर आज पडत चालला आहे. पाणी बचतीचा अवलंब आज प्रत्येकाने केल्यास पाण्याची समस्या हि गंभीर स्वरूप धारण करणार नाही. आज कित्येक घरामधील हजारो लिटर पिण्याचे पाणी नळयांच्या तोट्यांमधून नाल्यापर्यंत जात आहे. पाणी कपातीच्या काळात, अवास्तव पाण्याचा वापर करणे टाळले पाहिजे.
कपडे धुणे, वाहणे धुणे, या मध्ये सुयोग्य व्यवस्थापन केल्यास पाण्याचा सुयोग्य वापर करता येऊ शकतो. शेतीसाठी, दैनंदिन कामकाजासाठी, व सर्वच प्रकारच्या उदयोगांसाठी पाण्याची आवश्यकता महत्वाची आहे. यामध्ये पाणी बचतीची चळवळ उभी करणे गरजेचे आहे. वॉटर कप सारख्या स्पर्धामुळे गावा गावामध्ये श्रमदान सुरू आहे. जलक्रांती चा संदेश अनेक अभिनेते मंडळी देत आहेत. पण प्रत्यक्षात आपल्या जीवानासाठी आवश्यक असणार्या पाण्याच्या एका थेंबाला आपण प्रत्येकाने वाचवून आपल्या जीवनातील खरे स्टार होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात.