रिकाम्या बॉटल्स, ग्लोव्हज अन्य वस्तू “उघड्यावर’
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये करोनाचा प्रादूर्भावासह पर्यायाने जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) ही देखील एक मोठी समस्या झाली आहे. त्यावर उपाय शोधताना यंत्रणांना नाकीनऊ येत आहेत. पुणे शहरासोबतच आता विविध तालुक्यांमधूनही करोनासंदर्भातील जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबतची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
जैववैद्यकीय कचरा आणि त्याची विल्हेवाट हा अलिकडील काळात एक मोठा प्रश्न झाला आहे. करोनामुळे शहरासोबतच आता ग्रामीण भागातूनही जैववैद्यकीय कचऱ्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो उघड्यावर टाकला जात असल्याचा तक्रारी वाढत आहेत. विशेषत: विविध तालुक्यांमधून अशा तक्रारींमध्ये वाढल्याची मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. जे. बी. सांगेवार यांनी सांगितले.
डॉ. सांगेवार म्हणाले, “पुण्यात आतापर्यंत चार टन इतका जैववैद्यकीय कचरा निर्माण होत होता. मात्र, करोनामुळे त्यामध्ये वाढ होऊन हे प्रमाण आता नऊ टन इतके झाले आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावताना काही अडचणी येत आहेत.
मात्र, त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मास्क, सॅनिटायझरच्या रिकाम्या बॉटल्स, ग्लोव्हज या संसर्गजन्य वस्तू उघड्यावर टाकल्या जात असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. यासाठी मंडळाकडून आता प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून, यात दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल.’