Narayan Rane – शंकराचार्यांनी हिंदु धर्मासाठी स्वताचे काय योगदान दिले असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. काल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की शंकराचार्यांनी टीका करण्याऐवजी राम मंदिराला आशीर्वाद दिले पाहिजेत, शंकरार्चाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडे “राजकीय दृष्टीकोनातून” टीका करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की अयोध्येतील मंदिरासाठी आतापर्यंत कोणीही काही करू शकले नाही. मोदी, भाजपने ते हाती घेतले आणि मंदिर बांधले जात आहे. शंकराचार्यांनी मंदिराला आशीर्वाद द्यायचा की त्यावर टीका करायची? हे मंदिर आहे. राजकारणावर नाही तर धर्मावर ते बांधले गेले आहे. राम आमचा देव आहे, असे राणे म्हणाले. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे काय योगदान आहे ते सांगावे, असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने नारायण राणेंच्या वक्तव्याला आमचा पाठिंबा नाही असं म्हटलं आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, ‘श्री राम मंदिर समिती आणि शंकराचार्यांचा जो विषय आहे त्यात आम्हाला पडायचं नाही.
तसेच नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलं, त्यास आमची सहमती नाही, किंवा आमचा पाठिंबा नाही. काँग्रेस नारायण राणेंविरोधात आंदोलन करत असेल तर त्यांनी ते आंदोलन करावं. कदाचित त्यानिमित्ताने त्यांना रामाचं नाव घेण्याची इच्छा होईल. असं संजय शिरसाट यावेळी म्हणाले.