माणसाकडे तत्काळ विसरणे, हा सर्वोत्तम गुण आहे. त्यामुळे जगावर अनेक संकटे आली तरी त्यावर माणसाने मात केली. सर्व दुःख, केलेला संघर्ष विसरून पुन्हा गुणगुणत जगायला सुरुवात केली. दंगली, बॉम्बस्फोट, भूकंप, जोरदार पाऊस, चक्रीवादळे अशा, अनेक संकटांवर माणसाने समर्थपणे मात केली. हा माणसाचा सकारात्मक इतिहास. करोनवर सुद्धा आपण माणूस म्हणून मात करू, त्यावर माझा कलावंत म्हणून विश्वास आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपण अनामिक दहशतीखाली आहोत. काय होईल माझं? माझ्या कुटुंबियांचं, असा प्रश्न होता. या काळात माणसाने कुटुंबियांना भरपूर वेळ दिला. नव्यापिढीला सागरगोट्या, चल्लससारखे खेळ शिकता आले. कलावंत आपापल्या कलेत रमले. या काळात माणूस कुटुंबासोबत असल्याने व व्यस्तता कमी झाल्याने आजारी पडणे कमी झाले.
आम्ही कलावंत एखाद्या निर्मितीसाठी स्वत:ला लॉकडाऊन करूनच घेत असतो. तल्लीन होऊन निर्मिती करीत असतो. नियतीला, निसर्गाला सुद्धा उद्याचे आपले जगणे सुंदर करायचे असेल, म्हणून त्या निर्मितीत तल्लीनता यावी त्यासाठी हा “काळ” घेतला असेल. करोनावर मात करून भविष्यात माणूस जेंव्हा घराबाहेर पडेल, तेव्हा त्याला निसर्ग बदललेला दिसेल व निसर्गाला माणूस बदललेला दिसेल.
प्रमोद रामदिन
कलाशिक्षक, फिरोदिया हायस्कुल, नगर
संपर्क : 9850749212