Archana Patil : ’30 वर्षांत पक्षासाठी काय केलं?’; अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर वाद, अखेर दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या…
Archana Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अभूतपूर्व यशामुळे पक्षाच्या एकजुटीला तडा जावा, यासाठी काही घटक प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Archana Patil’s WhatsApp status : धाराशिव भाजपमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील (Zilla Parishad President Archana Patil) यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अभूतपूर्व यशामुळे पक्षाच्या एकजुटीला तडा जावा, यासाठी काही घटक प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच सोशल मीडिया टीमकडून पूर्वपरवानगीशिवाय आणि अनवधानाने संबंधित मजकूर प्रसिद्ध झाल्याचे सांगत, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.
अर्चना पाटील सध्या मुलाच्या पदवीप्रदान समारंभासाठी परदेशात असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. वेळेतील फरकामुळे त्यांच्या सोशल मीडिया टीमने अधिकृत स्टेटसवर मजकूर प्रसिद्ध केला, मात्र त्याबाबत त्यांना तत्काळ माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असल्याचे सांगत, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता राहील, असे त्यांनी म्हटले.
नेमकं काय होतं व्हॉट्सअॅप स्टेटस?
दरम्यान, अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळेच हा वाद निर्माण झाला होता. “निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या जुन्या नेत्यांनी गेल्या ३० वर्षांत पक्षवाढीसाठी नेमके काय योगदान दिले, ते उदाहरणांसह सांगा,” असे आव्हानात्मक वक्तव्य स्टेटसमध्ये करण्यात आले होते. या मजकुरामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.
यापूर्वी आमदार बसवराज पाटील (MLA Basavaraj Patil) यांच्या स्वागत कार्यक्रमात राणाजी विजयसिंह पाटील यांना वगळल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही “भाजप कोणत्याही एका कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही,” असे विधान करत पक्षातील घडामोडींवर भाष्य केले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील (MLA Rana Jagjitsinh Patil) यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या स्टेटसने वादाला आणखी धार दिली. अनिल काळे प्रकरण, बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यातील घडामोडी आणि जुने-नवे कार्यकर्त्यांमधील वाढती नाराजी यामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.





